जळगाव : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज जळगाव महानगरपालिकेत अनावरण करण्यात आले. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्टॅच्यू ऑफ युनिटी, मणिपूर आणि भारतवरून सडकून टीका केली.
जळगाव शहरातील पुतळा अनावरणावरून सुरु असलेल्या वादावर पडदा टाकण्यात आला असून उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण आज करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी, “आता भारत बोललं पाहिजे, इंडिया बोलालल्यावर खाज सुटायला लागली. इंडियाचा गवगवा केला होता, व्होट फॉर इंडियाचे नारे दिले होते. पण आम्ही इंडिया बोलल्यावर खाज सुटली, अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ”स्टेजवर उभा राहिल्यानंतर स्टेज हलू लागला आहे. मनात विचार केला की स्टेज कसं हलतंय, एकूण केंद्र सरकार डगमगायला लागलंय त्याचं हे प्रतिक आहे. केंद्र सरकार हलतंय.”त्यासोबतच “पुतळा कोणाचाही उभा करता येतो. काम करून जनतेने उपाधी दिल्याची काही तुरळक माणसं होऊन गेली. त्यात पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेल होते. त्यांचा पुतळा महानगरपालिकेच्या आवारात उभारलात आणि त्याचं अनावरण करण्याची संधी दिली यासाठी मी आभार मानतो”, असेही ठाकरे म्हणाले.
“सरदार वल्लभभाई पटेल हा माणूस दुरदृष्टीचा होता. त्यावेळी त्यांनी आरएसएसवर बंदीही आणली होती. जगातला सर्वांत मोठा पुतळा कुठे उभा केला माहितेय. पुतळ्याची उंची ठीक आहे, कामाची उंची कधी गाठणार? पुतळा उभारलात हे ठीक आहे, पण कामाची उंची गाठा ना”, असा टोला त्यांनी लगावला.
“१७ सप्टेंबरला मराठा स्वातंत्र्यमुक्ती दिन आहे. त्यावेळी जिनांचं निधन झालं होतं. त्यामुळे अनेकजण म्हणाले की ही कारवाई पुढे ढकला. पण वल्लभभाई बोलले की, नाही आजच कारवाई होणार. त्यांनी फौजा घुसवल्या आणि मराठवाडा अभिमानाने भारतात सामील करून घेतला. आज आम्ही पुतळे उभारतोय जरूर. वल्लभभाईंनी जशी मराठवाड्यात कारवाई केली तशी मणिपूरमध्ये कारवाई करण्याची हिंमत होत नाहीय. हे कसले पोलादी पुरूष, हे तकलादू पुरूष”, अशी टीकाही ठाकरेंनी पंतप्रधानांवर केली.