मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी 2 हजार रुपयांच्या गुलाबी नोटांवर मोठा निर्णय घेतला आणि त्या चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर अनेकांकडून सरकारवर टीका करण्यात आली. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा लोकसभा निवडणूकांशी संबंध असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
“भाजपने कोंडी करण्याचे राजकारण सुरू केले आहे. आरबीआयने घेतलेला दोन हजार रुपयांच्या नोटेबाबतचा निर्णय हा विरोधकांना निधीच मिळू नये यासाठी भाजपने केलेला खेळ आहे. यासाठीच भाजपने नोटंबदीचा निर्णय घेतला आहे.” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी राजकीय पक्षांनी गाफील राहू नये. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लोकसभेच्या निवडणूका लागतील, असा सल्लाही दिला आहे.
2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत चलनात राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानंतर 2 हजारांची चलनी नोट बाजारात आणण्यात आली होती. यापूर्वी 1 हजार रुपयांची नोट ही सर्वाधिक मूल्याची नोट होती. मात्र आता 2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत चलनात राहणार आहेत. म्हणजेच ज्यांच्याकडे सध्या 2000 रुपयांच्या नोटा आहेत, त्यांना त्या बँकेतून बदलून घ्याव्या लागतील.
त्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ देणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच बँका आता ग्राहकांना 2000 च्या नव्या नोटा देणार नाहीत.