Smita Patil Death Anniversary : सिनेसृष्टीत काही कलाकार असे असतात कितीही, काळ लोटला तरी त्यांची चमक कमी होत नाही. स्मिता पाटील त्यापैकीच एक. अवघ्या दहा वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी अभिनयाची नवी व्याख्या लिहिली. खोल नजर, प्रभावी भाव आणि अतिशय नैसर्गिक अभिनयामुळे त्या ‘वन टेक क्वीन’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. १७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुण्यात एका सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या जागरूक कुटुंबात स्मिता पाटील यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना नाटक आणि अभिनयाची आवड होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दूरदर्शनवर न्यूज रीडर म्हणून काम सुरू केलं. कॅमेऱ्यासमोरची त्यांची सहजता आणि संवादफेक पाहून दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. त्यांनी स्मितांना ‘चरणदास चोर’ या चित्रपटात संधी दिली आणि तिथूनच त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. साधेपणालाच बनवलं सामर्थ्य त्या काळात सिनेसृष्टीत ग्लॅमरला खूप महत्त्व होतं. मात्र स्मिता पाटील यांनी आपला साधेपणाच आपली ताकद बनवली. त्या मेकअपपासून दूर राहत आणि साध्या कपड्यांतच कॅमेऱ्यासमोर उभ्या राहत. त्यांचा नैसर्गिक सौंदर्यभाव आणि सहज अभिनय यामुळे त्या इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळ्या ठरल्या. अनेक दिग्दर्शक म्हणायचे, “स्मिताला अभिनय शिकवणं म्हणजे सूर्याला प्रकाश शिकवण्यासारखं आहे.” पहिल्याच टेकमध्ये परफेक्ट सीन सेटवर स्मिता यांची खासियत म्हणजे पहिल्याच टेकमध्ये सीन अचूक करणं. अनेकदा ‘कट’ म्हणायच्या आधीच दिग्दर्शकांना कळायचं की शॉट परफेक्ट झाला आहे. सहकलाकार सांगतात की इतर कलाकार रिहर्सलमध्ये गुंतलेले असताना स्मिता शांत बसून केवळ त्या सीनच्या भावना आत्मसात करत असत. कॅमेरा सुरू होताच त्या इतक्या सहजपणे भूमिकेत शिरायच्या की आजूबाजूचे सगळेच थक्क व्हायचे. अभिनयाची शाळा ठरलेले चित्रपट १९७७ मधील ‘भूमिका’ हा चित्रपट स्मिता पाटील यांच्या अभिनय क्षमतेचा सर्वोत्तम नमुना मानला जातो. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्या समांतर सिनेमाचा प्रमुख चेहरा बनल्या. ‘मंथन’, ‘चक्र’, ‘अर्थ’, ‘मिर्च मसाला’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही अभिनयाची पाठशाळा मानल्या जातात. अनेकदा प्रेक्षकांना वाटायचं की त्या पडद्यावर अभिनय करत नाहीत, तर तो अनुभव प्रत्यक्ष जगत आहेत. अवघ्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत स्मिता पाटील यांनी अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या. मात्र १३ डिसेंबर १९८६ रोजी, वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी त्यांचं अकाली निधन झालं. तरीही त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.