Smart Meter – ग्रामीण भागात कोणतीही पूर्वकल्पना न देता बळजबरीने स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रकाराला तात्काळ आळा घालावा, अन्यथा ‘स्मार्ट मीटर फोडो’ आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा पंचायत समितीचे विद्यमान सदस्य व युवा नेते स्वप्निल गायकवाड यांनी दिला आहे. राज्याची वीज वितरण कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडकडून ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू असून, ग्राहकांचा विरोध असतानाही जबरदस्तीने मीटर बसवले जात असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. या स्मार्ट मीटरमुळे पुढे कोणते तांत्रिक किंवा आर्थिक परिणाम होणार, याची कोणतीही सविस्तर माहिती ग्राहकांना देण्यात आलेली नाही. अतिरिक्त बिल आकारणी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. बिलाची रक्कम वेळेत भरली नाही तर थेट ऑनलाइन पद्धतीने विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. पूर्वी थकीत बिलाबाबत संबंधित वायरमन घरी येऊन किंवा दूरध्वनीद्वारे सूचना देत असत. मात्र आता केवळ एसएमएसद्वारे माहिती देऊन थेट कनेक्शन तोडण्याची प्रक्रिया राबवली जात असल्याने ग्रामीण वयोवृद्ध आणि साधे मोबाईल वापरणारे ग्राहक अडचणीत येत आहेत. अनेकदा मीटरमध्ये लाईट दर्शवत असताना घरातील वीजपुरवठा बंद झाल्याचे प्रकार घडत असल्याचेही त्यांनी सांगितले. स्मार्ट मीटर संदर्भात जनजागृती करावी ग्रामीण भागातील अनेक वयोवृद्धांच्या नावे मीटर आहेत. त्यांना ऑनलाइन बिल भरण्याची सवय नाही. अशा परिस्थितीत पूर्वसूचना न देता लाईट कट करणे म्हणजे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्यासारखे आहे,” अशी टीका गायकवाड यांनी केली. महावितरणने स्मार्ट मीटर संदर्भात जनजागृती करावी, पारदर्शक माहिती द्यावी व थकीत बिल प्रक्रियेत मानवीय दृष्टीकोन ठेवावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.