भवानीनगर -करोनाच्या महामारीत लॉकडाऊनच्या काळात लघु उद्योजक सलग दोन महिने दुकाने बंद असल्याने मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पुढील काळातही लॉकडाऊन वाढला तर कसे जीवन जगायचे हा एकमेव प्रश्न या सर्व व्यावसायिकांसमोर निर्माण झाला आहे.
महामारीच्या काळात भवानीनगर (ता. इंदापूर) येथील व्यापारपेठ मधील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद आहेत. यामध्ये मंडपवाले, प्रिंटिंग प्रेस, गाडी, डेकोरेटर (आर्ट) कारागीर, आचारी, वाढपी, वाजंत्री, घोडेवाले, सनईवाले, झांज पथक, हलगी पथक, सनई चौघडा, तुतारी वाले, गजरे विकणारे, आईस्क्रीमवाले या सर्वांच्या बरोबरच मंगल कार्यालय चालक यांचे व्यवसाय सध्या ठप्प पडले आहेत.
यापैकी अनेकांनी बॅंकेमार्फत कर्ज घेऊन ही कार्यालय उभे केलेले आहेत. आर्थिक नियोजनाबाबत बॅंका तसेच पतसंस्था व इतर ठिकाणांहून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अजूनही लॉकडाऊन संपलेला नसल्याने व पुढेही अजुन किती दिवस लॉकडाऊन सुरू असणार आहे हे माहीत नसल्याने व्यवसायिक आर्थिक चिंतेत सापडले आहेत.
लग्नसराईमध्ये सोन्याची खरेदी आपापल्या कुवतीनुसार लोक करत असतात. यामुळे सोन्याच्या दुकानात थोड्याफार प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. परंतु सोने खरेदीला लॉकडाऊनमुळे घरघर लागली आहे. अगदी छोट्या पद्धतीने दहा माणसांच्या आतच सध्याच्या काळात लग्न समारंभ आटोपला जाणार असल्याने लग्नपत्रिका न छापता व लग्न सराईत इतर कोणती सजावट न करता लग्न केले जात आहे. यामुळे प्रिंटिंग करणाऱ्या व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा झाला आहे.
या पुढील काळातही लग्नसराईचे दिवस संपल्याने हा प्रिंटिंग व्यवसाय अजूनही आर्थिक अडचणीत सापडणार आहे. पुढील काळात जगण्याचा मार्ग नक्की कसा असेल या चिंतेने हे सर्व व्यवसायिक चिंताग्रस्त झाले आहेत. आपला प्रपंच कसा चालवावा व कर्ज कशा पद्धतीने फेडावे या विवंचनेत सर्व व्यवसाय अडकले आहेत.
…तरच व्यवसाय तग धरून राहतील
लॉकडाऊन नंतर दुकान उघडले तरी दुकानाचे भाडे, कामगारांचा पगार, वीजबील व इतर खर्च वजा जाता हे सर्व व्यापारी आर्थिक बाजूने भक्कम न होता पुन्हा हे व्यवसायिक आर्थिक अडचणीत बुडणार आहेत. त्यामुळे केंद्र शासनाने व राज्य शासनाने लघु उद्योजकांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना योग्य तो न्याय देण्याची मागणी व्यावसायिकांमधून होत आहे. तरच हे व्यवसाय तग धरून राहणार आहेत. अन्यथा पुढील काळात लग्नसराईच्या काळातील कोणताच व्यवसायिक चांगल्या प्रकारचे जीवन जगू शकणार नाही.
लग्न सराईत चार पैसे मिळणार या अपेक्षांवर पाणी पडले आहे. जे काही पाच-दहा कामगार असतील त्या कामगारांना पगार देणे कठीण झाले आहे. आमच्यावरील कर्जाचा बोजा फेडणे कठीण झाले आहे. यासाठी राज्य सरकारने यातून आमच्यासारख्या व्यावसायिकांना पुन्हा उभारी घेण्यासाठी सर्व लघुउद्योजकांना बॅंकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी तरच हे सर्व व्यावसायिक पुढील काळात व्यवसाय करू शकतील.
– नितीन मोरे, डेकोरेशन व्यावसायिक.