कौशल्य विकास मंत्रालय व टाटा समूहाच्या वतीने मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट स्किल्स (आयआयएस) उभारण्यात येणार आहे. आयआयटीच्या धर्तीवर ही संस्था उभारण्यात येणार आहे. पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या या संस्थेसाठी शासनाकडून जमीन उपलब्ध करून देण्यात येणार असून उभारणीसाठी 300 कोटी रुपयांची गुंतवणूक टाटा समूहाकडून करण्यात येणार आहे. मुंबईतील सायन येथील नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या आवारातील साडेचार एकर जागेवर आयआयएसची उभारणी करण्यात येणार आहे. मागील आठवड्यात या कामाची पायाभरणी केंद्रीय कौशल्य व उद्योजकीय विकास मंत्री महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते करण्यात आली.
दहावी, बारावीनंतर तंत्रज्ञानविषयक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी याठिकाणी कौशल्य विकासाची दारे खुली होणार आहेत. याठिकाणी जागतिक तसेच भारतीय उद्योगांमध्ये लगेच काम करू शकणारे, उद्योगांची गरज भागवणारे मनुष्यबळ निर्माण करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित कौशल्य विकास संस्थांचे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव आयआयएसमधील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मुंबईबरोबरच अहमदाबाद आणि कानपूर येथेही आयआयएस सुरु करण्यात येणार आहेत.
ना नफा तत्वावर तीनही आयआयएस चालवण्यात येणार असून त्यासाठी खासगी संस्थांना 25 वर्षांच्या भाडेपट्ट्याने भूखंड देण्यात आले आहेत. या संस्था सुरु झाल्या की पाचव्या वर्षापासून प्रत्येक संस्थेतून दरवर्षी पाच हजार कुशल मनुष्यबळ निर्मिती होईल आणि त्यातील किमान 70 टक्के तरुणांना लगेच नोकरी मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे.