गेल्या 25 वर्षांत व्याधीचे प्रमाण वाढले वेगाने
पुणे – ‘ब्रेनस्ट्रोक’ हा आजार आता वयाशी संबंधित राहिलेला नाही. कोणत्याही वयातील व्यक्तीला तो होऊ शकतो, हे आता अनेक उदाहरणांनी सिद्ध झाले आहे. जागतिक स्तरावरील आलेख पाहता दर दोन सेकंदाला एकाला ब्रेनस्ट्रोक होतो. तर भारतात दर मिनिटाला सहा जणांना ब्रेनस्ट्रोक होतो. गेल्या 25 वर्षांत या व्याधीचे प्रमाण वेगाने वाढले आहे.
29 ऑक्टोबर हा “जागतिक ब्रेनस्ट्रोक दिवस’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने मेंदूशी निगडीत व्याधींविषयी जनजागृती करण्यात येते. मेंदूशी निगडीत अनेक रोग असले तरी त्यामध्ये महत्त्वाचा असलेला रोग म्हणजे “ब्रेनस्ट्रोक’ आहे. याची कारणे, त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजना याविषयी या दिवशी जागृती केली जाते.
वयोमानापरत्त्वे किंवा खूप स्ट्रेस असलेल्या व्यक्तीलाच ब्रेनस्ट्रोक येतो, रक्तदाब असलेल्या व्यक्तीलाच ब्रेनस्ट्रोक येतो, ही कल्पना जागतिक स्तरावरील “ब्रेनस्ट्रोक’ आलेल्या व्यक्तींची आकडेवारी पाहिली असता किती कालबाह्य झाली आहे हे लक्षात येईल. ब्रेनस्ट्रोक आलेल्या 20 टक्के रुग्णांचे वय हे चाळीशीच्या आतील आहे, ही वस्तुस्थिती आहे.
स्ट्रोक आल्यानंतर मेंदूच्या ज्या भागाचे शरीराच्या ज्या अवयवावर कंट्रोल आहे तो भाग निकामी होतो. अनेकदा व्यक्ती बेशुद्ध पडली असेल तर शुद्धीवर आल्यावरच नेमका कोणता भाग निकामी झाला आहे, हे समजते. स्ट्रोकची लक्षणे समजण्यासाठी बोलणे, हाताची हालचाल, चेहरा याचे निरीक्षण केल्यास, स्ट्रोकचा धोका लगेच ओळखता येतो.
जगात सुमारे साडेदहा कोटी जणांना ब्रेनस्ट्रोक होतो. त्यातील सहा कोटी लोक यातून वाचतात. परंतु, त्यातील 30 टक्के रुग्णांना कायमचे पक्षाघात म्हणजे अपंगत्त्व येते. त्यातूनही स्ट्रोक आल्यानंतर त्वरित उपचार मिळाल्यास 50-60 टक्के रुग्ण हे पूर्णत: नव्हे तर काही अंशी बरे होऊ शकतात. जे स्वत:ची कामे स्वत: करू शकतात. यातील बहुतांश रुग्ण हे फिजीओथेरपीनेच बरे होऊ शकतात. बदलती जीवनशैली हे या रोगामागचे महत्त्वाचे कारण आहे.
दारिद्य्ररेषेखालील रुग्णांची संख्या सर्वाधिक…
ब्रेनस्ट्रोक होणाऱ्यात दारिद्य्र रेषेखालील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. “स्ट्रोक’ आल्याचे न समजणे. तो आल्यानंतर वेळेत उपचार न घेणे आणि त्यानंतर फिजीओथेरपीच्या माध्यमातून उपचारांसाठी पैसा उपलब्ध न होणे या गोष्टी त्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे मृत्युचे प्रमाणही सर्वाधिक आहे. याशिवाय पक्षाघात झाल्यानंतर देवऋषी, जडीबुटी, मसाज, वेगवेगळ्या गावांना पक्षाघात घालवणारे बाबा असतात, अशी माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी नेणे असे प्रकारही या नागरिकांमध्ये जास्त असल्याने रुग्ण दगावतात.