सोलापूर – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी अजब वक्तव्य केले आहे. सोलापूर शहरातील रस्तेविकासकामांच्या उद्घाटनानंतर केलेल्या भाषणात त्यांनी हे विधान केले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यावेळी देशमुख म्हणाले, ‘‘राज्याच्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत तिची शिक्षणापासून लग्नापर्यंत काळजी घेतली आहे. आता मुलींची चिंता देवेंद्र फडणवीस करणार आहेत. काय माहीत नाही, या वेळेस महिलांवर फिदा झाले आहेत साहेब!”, असे विधान सुभाष देसाई यांनी केले आहे.
पुढे देशमुख म्हणाले, “राज्यातील महिलांच्या बचत गटासाठी देखील त्यांनी मुंबईत मॉल सुरू केला आहे. महिलांच्या बचत गटातील मालाला मुंबईत मार्केट मिळावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे भविष्यात सोलापूरच्या बचत गटांच्या उत्पादनांना चांगले दिवस येतील,” असेही सुभाष देशमुख म्हणाले.
दरम्यान, सुभाष देशमुख यांनी सरकारच्या कामाचे कौतुक करण्याच्या नादात भलतेच विधान केले आहे. मात्र त्यांच्या या विधानावर काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे.