नवी दिल्ली – विरोधकांना लोकसभा निवडणुकीतील त्यांचे भवितव्य ठाऊक आहे. त्यामुळे त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत (ईव्हीएम) शंका घेतली जात आहे. निकालाच्या दिवशी पराभवाचे खापर फोडण्यासाठी ते ईव्हीएमला बळीचा बकरा म्हणून पुढे करण्याच्या तयारीत आहेत, असे भाजपने म्हटले आहे. मतपडताळणीचे प्रमाण वाढवण्याबाबत विरोधकांनी दाखल केलेली याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते मुख्तारर अब्बास नक्वी यांनी लक्ष्य केले. विरोधकांची भूमिका युद्धावेळी शरण येणाऱ्या सैनिकांप्रमाणे आहे, अशी खिल्लीही नक्वी यांनी उडवली. ईव्हीएमबाबतचा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार विरोधकांनी व्यक्त केल्यावर भाजपकडून त्यांच्यावर पलटवार करण्यात आला.