Sidhu MooseWala Murder: सिद्धू मूसेवाला खून प्रकरणात भूपी राणा टोळीची एन्ट्री, मारेकऱ्याचा पत्ता सांगणाऱ्याला 5 लाखांचे बक्षीस जाहीर

नवी दिल्ली – लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर अनेक गुंडांच्या टोळ्यांची सोशल मीडियावर सतत बदला घेण्याची चर्चा सुरू आहे. आतापर्यंत, बंबिहा ग्रुप, नीरज बवाना ग्रुपने एका फेसबुक पोस्टद्वारे जाहीर केले होते की, ते हत्येचा बदला घेणार आहेत. मात्र, आता या खून प्रकरणात हरियाणाचा गँगस्टर भूपेंद्र सिंग उर्फ भूपी राणा टोळीने उडी घेतली आहे.
तुरुंगात बंद असलेल्या हरियाणाचा गँगस्टर भूपिंदर सिंग उर्फ भूपी राणा याच्या वतीने एका कथीत फेसबुक पोस्टद्वारे गुरुवारी सांगण्यात आले की, जो कोणी प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या मारेकऱ्यांबद्दल माहिती देईल त्याला 5 लाख रुपये देण्यात येतील. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, मुसेवाला हत्या प्रकरणाचा तपास करणार्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अधिकाऱ्याने सांगितले की, पंजाब पोलिसांचा सायबर सेल सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या सर्व पोस्ट आणि अलीकडेच समोर आलेल्या अनेक खात्यांवरून आलेल्या धमक्यांची चौकशी करत आहे.
हरियाणातील कर्नाल तुरुंगात बंद असलेल्या भूपी राणाच्या असत्यापित सोशल मीडिया अकाऊंटवर अपलोड करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सिद्धू मुसेवाला यांच्याशी आमचा कोणताही संबंध नव्हता, पण जेव्हा त्यांना आमचा भाऊ म्हणत त्यांची हत्या करण्यात आली, तेव्हा आम्हालाही आमचे काम करावे लागेल. जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे. या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, सर्वांना विनंती आहे की, जर कोणाकडे मूसेवालाच्या मारेकऱ्यांबद्दल काही माहिती असेल तर आम्हाला सांगा तो कुठेही असो. जो कोणी मारेकऱ्यांची माहिती देईल त्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल आणि माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.
दरम्यान, मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात रविवारी 28 वर्षीय मूसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. हत्येनंतर लगेचच, कॅनडा-स्थित गँगस्टर गोल्डी ब्रार आणि तिहार तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने हत्येची जबाबदारी स्वीकारली आणि युवा अकाली दलाचे नेते विकी मिड्दुखेडा यांच्या हत्येचा बदला घेतल्याचे सांगितले. बिश्नोई टोळीने मूसेवाला यांचा कट्टर प्रतिस्पर्धी दविंदर बंबीहा टोळीशी संबंध असल्याचा आरोप केला होता.





