विश्रांतवाडी – सिद्धार्थनगर (विमाननगर) येथील झोपडपट्टीवासीयांची घरे रस्ता रुंदीकरणासाठी हटविण्यात आली आहेत. सुमारे 200 झोपड्या आणि 15 दुकाने यामध्ये बाधित झाली आहेत. गेली 14 वर्षे येथील रहिवासी असुविधांचा सामना करत गैरसोयीच्या भागात रहात आहेत. त्यांना हक्काचे घर कधी मिळणार, असा प्रश्न आमदार सुनील टिंगरे यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “लवकरच याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बैठक बोलावली जाईल व झोपडपट्टीवासीयांचा प्रश्न सोडविला जाईल,’ असे आश्वासन दिले. त्यामुळे आता लवकरच सिद्धार्थनगर झोपडपट्टीवासीयांचा घराचा प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.
आमदार टिंगरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, “पुणे येथे 2009 मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू, व्हीआयपींच्या वाहनांसाठी विमानतळालगत असलेल्या सिद्धार्थनगर(विमाननगर) झोपडपट्टीतून जाणाऱ्या व्हीआयपी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. यामध्ये जवळपास 200 झोपड्या आणि 15 दुकाने बाधित झाली होती. तत्कालीन आयुक्त प्रवीणसिंग परदेशी यांनी झोपडपट्टीवासीयांशी चर्चा करून रस्ता रुंदीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यावेळी परदेशी हे एसआरएचे सीईओदेखील होते. त्यांनी बाधितांना एसआरए योजनेमध्ये घरे आणि दुकाने उपलब्ध करून देण्याचे असे आश्वासन दिले होते. त्यानंतर झोपडपट्टीवासीयांनी विश्वास ठेवून आपली घरे, दुकाने मोकळी करून रस्त्यासाठी जागा दिली होती. तब्बल 14 वर्षे झाली झोपडपट्टीवासीय हक्काच्या घरासाठी लढत आहेत. तरीही अद्याप बाधितांना शासनाच्या कोणत्याही योजनेतून ना महापालिका प्रशासनाने पक्की घरे दिली ना एसआरए योजनेतून मिळाली. दोन्ही बाजूने उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नाही.’
जर कोणी 14 वर्षे घरासाठी लढत असेल तर त्यांना हक्काची घरे मिळाली पाहिजेत. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुणे महापालिका आयुक्त, एसआरएचे सीईओ यांची बैठक बोलावून हा प्रश्न सोडविला जाईल. तसेच ज्याठिकाणी एसआरए योजना लागू करता येईल, त्याठिकाणी ती लागू करून झोपडपट्टी निर्मूलनासाठीदेखील प्रयत्न केले जातील.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री