म्हैसूर : कर्नाटकातील मुख्यमंत्री बदलाच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या हायकमांडलाच घ्यावा लागेल, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी व्यक्त केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटकातील नेतृत्वपदाचा वाद हा स्थानिक पातळीवरचा असून हायकमांडमध्ये कोणताही गोंधळ नाही, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांचे हे विधान आले आहे. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, त्यांनी हायकमांडशी चर्चा केली असून नेतृत्व योग्य वेळी निर्णय घेईल. लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आणि हायकमांड जो काही निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माध्यमांनी आपण पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार का, अशी विचारणा केली असता, तो निर्णयही पूर्णपणे हायकमांडवर अवलंबून असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, या खर्गे यांच्या विधानाशी सहमती दर्शवत सिद्धरामय्या म्हणाले की, ही बाब सर्वांनी स्वीकारली पाहिजे. राज्यातील काँग्रेस सरकारने २० नोव्हेंबर रोजी आपल्या कार्यकाळाचा अर्धा टप्पा पूर्ण केल्यानंतर मुख्यमंत्री बदलाच्या अटकळींना वेग आला आहे. एका बाजूने प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार नेतृत्व मिळवण्यासाठी जोर लावत आहेत. त्यामुळे स्थानिक नेतृत्वामध्ये अनेकदा खडाजंगीचे प्रसंग ओढावले आहेत.