नवी दिल्ली – कर्नाटक सरकारचा नवीन आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री या नात्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केला. या अर्थसंकल्पाचा आकार गेल्या वर्षीच्य अर्थसंकल्पापेक्षा २३ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प २६५,७२० कोटींचा होता तो आता ३२७,७४७ कोटी रूपयांवर गेला आहे. कर्नाटक सरकारने राज्यातील नागरीकांना ज्या पाच हमी दिल्या होत्या त्यामुळे राज्य सरकारची तिजोरी रिकामी झाली असल्याचा आरोप केला जात होता परंतु प्रत्यक्षातील स्थिती वेगळी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नागरीकांच्या हातात पैसे गेल्याने अर्थकारणाला चालना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
या अर्थसंकल्पात ५० मोरारजी देसाई निवासी शाळा सुरू केल्या जातील. प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची १०० पोस्ट-मॅट्रिक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू केली जातील. १०० नवीन मौलाना आझाद शाळा उघडल्या जातील.अल्पसंख्याक समुदायातील महिला बचत गटांना विविध प्रकारच्या स्वयंरोजगार उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. वक्फ मालमत्तांच्या विकासासाठी रु. १०० कोटींची तरतूद केली जाईल असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
मुख्यमंत्रिपद आणि अर्थखाते या दोन्ही पदांवर असलेले सिद्धरामय्या यांचा हा १५ वा अर्थसंकल्प त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक विक्रमी मैलाचा दगड ठरला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, शक्ती, गृहज्योती, गृह लक्ष्मी, युवानिधी आणि अन्नभाग्य या ५ हमी योजनांच्या माध्यमातून आम्ही २०२४-२५ या आर्थिक वर्षात ५२००० कोटी रुपये करोडो लोकांच्या हातात देत आहोत. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला सरासरी ५० ते ५५ हजार रुपये हस्तांतरित केले जातील.
ते म्हणाले की या हमी योजनांच्या अंमलबजावणीमुळे आम्हाला जगभरातून कौतुक मिळाले आहे.
हमी योजनांचा सकारात्मक आर्थिक आणि सामाजिक परिणाम कालांतराने अधिक स्पष्ट होईल. अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय एजन्सी आमच्या कामाचा अभ्यास करत आहेत आणि त्यांचे कौतुक करत आहेत. या अर्थसंकल्पात त्यांनी राज्यातील विविध विकास कामांसाठी व्यापक गुंतवणूक केली असून पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठीच्याही तरतूदी करण्यात आल्या आहेत.