Shrish Dhende Missing Case – नऱ्हे परिसरातील १४ वर्षीय श्रीश धेंडे बेपत्ता होऊन दहा दिवस उलटले, तरीही त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. कॅनॉलमध्ये बुडाल्याचा संशय असून प्रशासनाची टोलवाटोलवी, शोधकार्यातील ढिलाईच्या पार्श्वभूमिवर एका वडिलांची एकाकी झुंज या प्रकरणाला गंभीर बनवत आहेत. श्रीश हा ६ एप्रिल रोजी मित्रांसोबत मूर्ती विसर्जनासाठी गेला असताना अचानक बेपत्ता झाला. तपासात सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याच्यासोबतची काही मुले श्रीशचे कपडे, मोबाइल घेऊन पळताना दिसत आहेत. सुरुवातीला या मुलांकडून परस्परविरोधी माहिती मिळाली. नंतर एका मुलाने श्रीश कॅनॉलमधील पाण्यात बुडाल्याचे सांगितले. तथापि, या दिशेने शोधकार्य अपेक्षित वेगाने झाले नसल्याचे दिसते. अग्निशमन दलाने कॅनॉलमधील पाण्याचा वेग जास्त असल्याचे कारण देत मोहिम प्रभावीपणे राबवली नाही. जलसंपदा विभागाने पाणी कमी करण्यास नकार दिल्याने शोधकार्य ठप्प झाले. याबाबत श्रीशचे वडील प्रदीप धेंडे यांनी सरकारी यंत्रणा निष्क्रिय बसल्या आहेत का? ” असा संतप्त सवाल करत त्यांनी स्वतःच्या खर्चाने जेसीबी यंत्र लावून कॅनॉल परिसरात शोधकार्य सुरू केले. खडकवासला कालवा. पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवूनही ठोस मदत न मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, नांदेड सिटी पोलिसांनी खडकवासला विभागाशी पाण्याचा विसर्ग कमी करण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. पाणी कमी झाल्यानंतर शोधमोहीम प्रभावीपणे राबवली जाईल, असे त्यांचे मत याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस म्हणाले की, कॅनॉलमध्ये पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असून झाडा-झुडपांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे सध्या शोधकार्य करणे धोकादायक आहे. अनेकदा गळ टाकून पाहिले, मात्र कचराच अडकत आहे. श्रीशसोबत असलेल्या मुलांची चौकशी करण्यात आली असून त्यांनी भीतीपोटी सुरुवातीला माहिती लपवली होती. आता त्यांनी श्रीश बुडाल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, श्रीशच्या आईशी पोलिसांनी संपर्क साधून कोणावर संशय असल्यास पोलीस ठाण्यात येऊन माहिती देण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्या पोलिसांत येण्यास तयार नसल्याने त्यांच्याशी व्हिडिओ कॉल संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. दहा दिवस उलटूनही कोणताही ठोस पुरावा किंवा निष्कर्ष समोर न आल्याने या प्रकरणात प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. एका निष्पाप मुलाच्या शोधासाठी कुटुंबीयांनाच स्वतः झगडावे लागत असल्याची ही घटना प्रशासनाच्या अपयशाकडे बोट दाखवते. “नवले, जनता वसाहत अग्निशमन दलाची प्रत्येकी एक गाडी घटनास्थळी आहे. तसेच आमची सर्च पथकेही कार्यरत आहेत. पाण्याचा प्रवाह जास्त असला तरी आम्ही कार्यरत आहोत.” – प्रशांत गायकर, अग्निशमन दल अधिकारी