नारायणगाव – जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ नियोजनामुळे आमच्या हक्काचे पाणी असताना देखील आम्हाला मिळाले नसल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे या निवडणुकीत विद्यमान लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवणार, असे प्रतिपादन श्रीकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश गावडे यांनी केले.
जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच उमेदवार अतुल बेनके यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 12) सावरगाव-धालेवाडी जिल्हा परिषद गटातील वाणीमळा, पाबळवाडी, काचळवाडी, सावरगाव या ठिकाणी गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी वाणीमळा येथे मतदारांशी संवाद साधताना गावडे बोलत होते. याप्रसंगी उमेदवार अतुल बेनके, माजी सभापती बाजीराव ढोले, दशरथ पवार, अनिकेत वाणी, अतुुल खांडगे, महादु गुळवे, अरूण पारखे, अंकुश खांडगे, शंकर कचरे, ज्ञानेश्वर पंचग, सीताराम केदार, जयेश पंचग, तबाजी पंचंग यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजेश गावडे म्हणाले की, आता आपल्याला हक्काच्या पाण्यासाठी पाण्याचे नियोजन करणारा प्रतिनिधी निवडून द्यायचा, त्यासाठी अतुल बेनके हेच योग्य उमेदवार आहे आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अतुल बेनके म्हणाले की, आपल्या भागात वडज हे छोटे धरण आहे. या धारणांचे पाणी आपल्या भागासाठी विशेष करून मिनाखोरे, मीना नदीसाठी आरक्षित करून ठेवण्याचा आपला मानस आहे. तसेच कालव्यातून येणारे पाणी पिंपळगाव व वाणीमळा आणि या परिसरातील शेतीसाठी किमान वर्षांत पाचवेळा कसे देता येईल यासाठी प्रयत्न
करणार आहोत.
आपण संधी दिल्यास शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकार तत्वावर शेती मालावर प्रक्रिया करणारे प्रक्रिया केंद्र उभारणार असून याचा लाभ आपल्या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे. या प्रक्रिया केंद्रामुळे तरुणांना रोजगार व शेतकऱ्यांना जास्त नफा मिळणार आहे.
– अतुल बेनके, उमेवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस, जुन्नर विधानसभा मतदारसंघ