नवी दिल्ली : ईशान्य भारत आणि बिहारमध्ये पावसाची वक्रदृष्टी पडली आहे. त्यामुळेच इथल्या नद्यांना पुर आल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, ईशान्य भारतात आलेल्या पुराचा तब्बल 14 लाख लोकांना फटका बसला आहे. या पुरामुळे 16 जणांचा मृत्यू झाला असून ईशान्य भारतातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याचा मोठा फटका आसामला बसला असून राज्यातील 17 जिल्हे प्रभावित झाले असल्याचे दिसत आहे.
आतापर्यंत आसाममध्ये या पूरामुळे 4 लाख नागरिक प्रभावित झाले असून ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच यामुळे राज्यातील 16 लाख हेक्टर पिकक्षेत्र पाण्याखाली गेले आहे. तर तिकडे कांझीरांगा अभयारण्यातदेखील पुरस्थिती निर्माण झाली असून प्राण्यांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. या सर्व परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मदतीचे आश्वासन राज्य सरकारला दिले आहे.