बॉलीवूडमधील बऱ्याच चित्रपटांचे प्रदर्शन करोना व्हायरसमुळे लांबणीवर पडले आहे. तसेच काही चित्रपटांचे शूटिंगही रखडले आहे. लॉकडाउन लागू होण्याच्या अगोदर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी हे लखनौमध्ये “भूलभुलैया 2′ चित्रपटाचे शूटिंग करत होते.
देशातील करोनाचा धोका अद्याप संपलेला नसला तरी हळूहळू परिस्थिती सामान्य होत आहे. अशात या चित्रपटाच्या निर्मात्यांनाही लवकरच चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात येईल असे सुतोवाच केले आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी म्हणाले, चित्रपटाचे चित्रीकरण लखनौमध्ये असल्याने उत्तर प्रदेश सरकारची परवानगी मिळाल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात येईल. आम्हाला लवकरच लखनौला जावून चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करावे लागेल. आम्ही एक मोठा सेट स्थापित केला आहे आणि गेल्या काही महिन्यांत हा सेट कोणीही वापरलेला नाही.
आम्हाला आशा आहे की, “भूलभुलैया-2’चे शूटिंग सप्टेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात येईल. दरम्यान, आतापर्यत या चित्रपटाचे 35 दिवसांचे शूटिंग बाकी आहे आणि निर्मात्यांना आशा आहे की, हे शूटिंग लवकरच पूर्ण होईल. यापूर्वी हा चित्रपट 31 जुलै रोजी रिलीज होणार होता, परंतु करोना विषाणूमुळे चित्रपटाची रिलीज डेट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.