नवी दिल्ली – गलवान खोऱ्यात भारत-चीन संघर्षानंतर मोदी सरकारने स्वदेशीचा नारा दिला आहे. यानुसार केंद्र सरकारने सेमी हाय स्पीड ‘वंदे भारत’ ट्रेनचं कंत्राट रद्द करत चीनला झटका दिला आहे. यासंदर्भातील माहिती रेल्वे मंत्रालयाने माहिती दिली आहे.
४४ सेमी हाय स्पीड ट्रेनचा पुरवठा करण्यासाठी मागील वर्षीच निविदा काढण्यात आल्या होत्या. यामध्ये केवळ सीआरआरसी पायनियर इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सहा अर्जदारांमध्ये पात्र ठरले. चीनमधील CRRC Yongji Electric Company Ltd आणि गुरुग्राम येथील Pioneer Fil-Med Pvt Ltd यांनी २०१५ मध्ये एकत्रित ही कंपनी सुरु केली होती. करारानुसार ही कंपनी वंदे भारताच्या १६ कोच तयार करण्यासाठी आणि विद्युत उपकरणे व इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करणार होती. मात्र, करार रद्द झाल्याने चीनला मोठा झटका बसल्याचे मानण्यात येत आहे.
दरम्यान, एका आठवड्यात वंदे भारतासाठी नवीन कंत्राट देण्यात येईल. भारतीय कंपनीला हे कंत्राट मिळावे यासाठी रेल्वे प्रयत्नशील असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी १५ फेब्रुवारीला दिल्ली-वाराणसी मार्गावर वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन केलं होतं. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते दुसऱ्या मार्गावरील सेवा सुरु करण्यात आली होती.