नागपूर – एका धावत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. ही बस नागपूरवरून अमरावतीकडे निघाली होती. मात्र कोंढाळी परिसरात असलेल्या साईबाबा मंदिराजवळ अचानक या बसला आग लागली. यावेळी या बसमध्ये एकूण १६ प्रवासी होते. या घटनेत बस जळून खाक झाली आहे. ही बस 16 प्रवासी घेऊन नागपूरवरून अमरावतीकडे चालली होती.
शॉर्ट सर्किटमुळे या बसला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणालाही इजा झालेली नाही. मात्र या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या घटनेनंतर प्रवासी देखील घाबरले होते. मात्र प्रसंगावधान राखत प्रवासी खाली उतरले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
अचानक लागलेल्या आगीमुळे बसमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले होते. त्यानंतर आगीने भीषण रूप धरण केले होते. परंतु कोंढाळी पोलिस अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, या आधी देखील अनेकदा शिवशाही बसने पेट घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही त्यावर अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. सततच्या घडणाऱ्या या घटनेमुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.