शिवसेनेचे लातूर जिल्हा नेते साळुंके यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून निलंग्यात एका कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ते कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. लातूर येथील कॉंग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी अमित देशमुख, अशोक पाटील निलंगेकर, विजयकुमार पाटील आदी उपस्थित होते.
दोन्ही निलंगेकर एक असल्याचा गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप अशोक पाटील निलंगेकर यांनी केला आणि अभय साळुंके यांच्या कॉंग्रेस प्रवेशाचे स्वागत केले. अभय साळुंके यांच्या प्रवेशामुळे कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढणार असल्याची प्रतिक्रिया आ. अमित देशमुख यांनी व्यक्त केली.
लातूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ झाल्यानंतरची ही तिसरी आणि शेवटची निवडणूक होत आहे. नियमाप्रमाणे कुठलाही एक मतदारसंघ पंधरा वर्षांपेक्षा अधिक राखीव ठेवता येत नाही. 2024 च्या निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघ सर्वांसाठी खुला होणार आहे.