मुंबई – शिवसेनेतून बंडखोरी करत काही आमदारांनी आपला वेगळा गट बनवला आणि भाजपच्या पाठींब्यावर सरकार स्थापन केले. यावेळी अनेक आमदारांच्या रडारवर शिवसेना खासदार संजय राऊत असल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकार स्थापनेपूर्वी राऊतांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं म्हणत भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलं होत. आता सत्ता गेल्यानंतर देखील संजय राऊत शिवसेनेच्यावतीने किल्ला लढवताना दिसत आहेत. कधी माध्यमांमार्फत तर कधी सोशल मीडियाद्वारे संजय राऊत वक्तव्य करताना दिसून येतात.
शिंदे फडणवीस सरकारवर सध्या न्यायालयाची टांगती तलवार आहे. त्यामुळे या नव्या सरकारच्या भवितव्याबाबत वारंवार सवाल उपस्थित केले जातात. संजय राऊत यांनी देखील आपल्या शायराना अंदाजात ट्विट करत सूचक व्वक्तंव्य केलं आहे. आज केलेल्या ट्विटमध्ये राऊतांनी ओशो यांचं एक वाक्य शेअर केलं आहे.
“मनुष्य का हमेशा डर के माध्यम से ही शोषण किया जाता है – ओशो ! जो डर गया, वो मर गया. जय महाराष्ट्र”, असं राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. सध्या संजय राऊत हे ईडीच्या रडारवर देखील आहेत. त्यामुळे त्यांनी केलेले हे ट्विट बरेच काही सांगून जाते.
मनुष्य का हमेशा
डर के माध्यम से ही
शोषण किया जाता है !
__ ओशो
जो डर गया वो मर गया.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/7R1PWnUrxL— Sanjay Raut (@rautsanjay61) July 21, 2022
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी संजय राऊत आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत आपली खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर राऊतांनी मात्र सत्ताधाऱ्यांवर टीका सुरूच ठेवल्याचे पाहायला मिळाले. दरम्यानच्या काळात त्यांची ईडीकडून देखील चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधातील हा संघर्ष किती वाढणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.