कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह आहे का ? असा सवाल काँग्रेसचे आमदार सतेज पाटील उपस्थित केला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार राज्यपाल तथा कुलपती यांनी शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती करणे आवश्यक होते. विद्यमान कुलगुरुंचा कार्यकाळ ६ऑक्टोबर २०२५ रोजी संपला आहे, पण यासंदर्भात आजअखेर कोणताही निर्णय झालेला नाही. शिवाजी विद्यापीठाच्या ६३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरू पद रिक्त राहिले आहे. नेमकी कोणाची शिक्षणाबाबतची अनास्था याला कारणीभूत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह आहे का?, ज्या दिवशी विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड होते त्याच दिवशी त्यांचा कार्यकाळ कधी संपतो हे ठरलेले असते. असे असूनसुद्धा पूर्णवेळ कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया करणे तर दूरच, पण प्रभारी कुलगुरूसुद्धा का नियुक्त केलेले नाहीत. असे प्रश्न सतेज पाटील यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी भूमिका घेतली आहे.विद्यापीठाचे नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.