Shivabhojan Thali Yojna : गेल्या काही काळापासून निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिवभोजन थाळी योजनेला (Shivabhojan Thali Yojna) अखेर राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या योजनेसाठी ५५ कोटी रुपयांची पुरवणी मागणी विधिमंडळात सादर करण्यात आली असून, यामुळे राज्यातील शिवभोजन योजना (Shivabhojan Thali Yojna) पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने आणि सुरळीतपणे सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्यातील गोरगरीब आणि गरजू जनतेला अल्पदरात जेवण मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन (Shivabhojan Thali ) योजनेसमोर गेल्या काही दिवसांपासून थकीत देयकांचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक केंद्र चालकांनी थकीत अनुदानामुळे केंद्र चालवण्यास अडचणी येत असल्याचे सरकारला कळवले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. योजनेसाठी एकूण १५० कोटी रुपयांच्या निधीची गरज असताना, चालू आर्थिक वर्षात आधीच ७० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. आता उर्वरित प्रलंबित देयके आणि दैनंदिन खर्चाची तरतूद करण्यासाठी अतिरिक्त ५५ कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिवभोजन केंद्र चालकांना मोठा आर्थिक आधार मिळाला असून, निधी अभावी रेंगाळलेली देयके आता अदा केली जाणार आहेत. या नवीन आर्थिक तरतुदीमुळे योजनेच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर होण्याची शक्यात निर्माण झाली आहे. सरकार या योजनेबाबत सकारात्मक असून कोणत्याही परिस्थितीत ती बंद पडू दिली जाणार नाही, असा विश्वासही यावेळी प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.