अमोल मिटकरी : दिलीप मोहिते यांच्या प्रचारार्थ वाडा येथे घेतली सभा
राजगुरूनगर- शिवस्वराज्य यात्रेचा धसका घेतल्याने सत्ताधारी पार्सल राज्यात सभा घेत आहेत. मात्र, आता पवारलाट उसळली आहे. त्यामुळे ही जनता कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केले.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 12) वाडा येथे आयोजित सभेत मिटकरी बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी आमदार तथा आघाडीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार राम कांडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा राक्षे, माजी सभापती रामदास ठाकूर, सुरेश शिंदे, युवा नेते ऋषिकेश पवार, सभापती बाळशेठ ठाकूर, उपसभापती सुगंधा शिंदे, जिल्हा परिषद माजी सदस्या सुरेखा मोहिते, विद्यमान सदस्या निर्मला पानसरे, दीपाली काळे, अरुण चांभारे, राजाराम लोखंडे, अशोक राक्षे, दशरथ गाडे, दत्ता खाडे, रामदास माठे, काळराम सुपे, सतीश राक्षे, प्रतीक मोहिते आदिंसह तालुक्याच्या पश्चिम भागातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
अमोल मिटकरी म्हणाले की, निवडणुकांच्या तोंडावर जनतेला दहा रुपयांना जेवणाची थाळी देण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. परंतु आम्ही सक्षम आहोत, आम्हाला नको तुमची जेवण थाळी. मागील पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी समाजोपयोगी कामे केली नाहीत. उलट जनतेची दिशाभूल करून स्वतःची घरे भरली. भाजपच शिवसेनेचे कंबरडे मोडण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, ही शिवसेना त्यांच्याच मागे जागांसाठी तसेच पदांसाठी लाचार होत आहे. लोकसभा निवडणुकीत जातीचे राजकारण करणाऱ्यांना जनतेने जसे घरी पाठवले तसेच यावेळीही विरोधकांना घरी बसवा. दिलीप मोहितेंना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी अमित शाह, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील थिगळे, तर कैलास सांडभोर यांनी आभार मानले.
- खेड तालुक्याच्या पश्चिम भागाच्या विकासात माजी आमदार मोहिते यांचे मोठे योगदान आहे. पश्चिम भागात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र 5 वर्षे या भागातील विकासाला खीळ बसली आहे. अकार्यक्षम आमदार मिळाल्याने जनतेचे नुकसान झाले. मात्र, यावेळी या भागातील जनता सजग बनली असून विकासाच्या मागे उभी राहिली आहे. या भागातील जनता मोहिते यांच्या पाठी ठामपणे उभी राहणार असल्याने बहुमताने दिलीप मोहिते पाटील विजयी होतील.
– अरुण चांभारे, माजी सभापती, जिल्ह परिषद