Shiv thakare : महाराष्ट्रात सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने परवाना मिळवण्यासाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे स्थानिक भाषेला प्राधान्य देणे आणि प्रवाशांशी संवाद सुलभ होणे हा उद्देश असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, अमराठी चालकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला असून तो अन्यायकारक असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर विविध चालक संघटनांनी ४ मेपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. संघटनांच्या मते, राज्यभरातील सुमारे १५ लाख चालक या आंदोलनात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे मुंबईसह अनेक शहरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान, बिग बॉस फेम आणि अभिनेता शिव ठाकरे याने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. शिव ठाकरे हा “Bigg Boss 16” मधून घराघरात पोहोचलेला चेहरा असून, त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. मराठी संस्कृतीशी जोडलेला आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा शिव नेहमीच सामाजिक विषयांवर आपली भूमिका मांडताना दिसतो. या वादाच्या पार्श्वभूमीवर शिव ठाकरेने आपल्या पोस्टमध्ये ४ मे रोजी होणाऱ्या संपादरम्यान लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. Shiv thakare त्याने आपल्या वाहनाचा नंबर आणि ओळख सांगत, गरज पडल्यास लोकांनी त्याची गाडी थांबवावी आणि तो त्यांना मदत करेल, असे आवाहन केले आहे. “मराठी माणूस थांबता कामा नये” हा संदेश देत त्याने सामाजिक जबाबदारीची जाणीवही करून दिली आहे. “राम राम महाराष्ट्र, ४ मे रोजी टॅक्सी ड्रायव्हर्सचा संप आहे. तरीही आपल्या सेवेत तुम्हाला कुठेही MH 27 DK 0909 (टाटा हॅरियर) ही तुमच्या हक्काची टॅक्सी, रिक्षा दिसल्यास हक्काने थांबवणे. आपली खूण एकच – गाडीच्या पाठीमागे जय महाराष्ट्र आणि ड्रायव्हर सीटवर भगवा फेटा असलेला दादा आपल्या सेवेस सदैव तत्पर.. काहीही हो.. मराठी माणूस थांबता कामा नये. तुमचा आपला माणूस शिव ठाकरे. असं तो म्हणाला आहे. शिव ठाकरेच्या या भूमिकेचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. अनेकांनी त्याच्या या उपक्रमाला “संकटात धावून येणारा” असा प्रतिसाद दिला आहे. सार्वजनिक अडचणीच्या काळात स्वतः पुढे येऊन मदत करण्याचा त्याचा प्रयत्न लोकांना भावला आहे. दरम्यान, मराठी सक्तीच्या निर्णयाला काही मराठी कलाकारांनीही पाठिंबा दिला आहे. स्थानिक भाषेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. एकूणच, हा वाद केवळ भाषेपुरता मर्यादित नसून, तो सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंशी जोडलेला आहे. पुढील काही दिवसांत या प्रश्नावर सरकार आणि संघटनांमध्ये तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.