Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद रणधुमाळीत शिवसेनेची भूमिका सावध; भाजपच्या संख्याबळाची दखल घेत निर्णय ‘हायकमांड’कडे
Vidhan Parishad Election 2026 महायुतीतील घटक पक्ष म्हणून भाजपच्या संख्याबळाची आणि निवडणुकीतील प्रभावी स्थितीची दखल घेत कोणतीही भूमिका मांडताना समन्वय आणि राजकीय वास्तव लक्षात घ्यावे लागेल, अशी स्पष्ट भावना बैठकीत व्यक्त झाल्याची माहिती आहे.

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषदेच्या सातारा- सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राजकीय समीकरणांवर सखोल चर्चा झाली. शिवसेनेच्यावतीने विधान परिषदेच्या निवडणूक संदर्भातील सर्व अंतिम अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला याबाबत सदस्यांच्या तीव्र भावना वरिष्ठ कार्यकारणीला कळवल्या जातील, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
महायुतीतील घटक पक्ष म्हणून भाजपच्या संख्याबळाची आणि निवडणुकीतील प्रभावी स्थितीची दखल घेत कोणतीही भूमिका मांडताना समन्वय आणि राजकीय वास्तव लक्षात घ्यावे लागेल, अशी स्पष्ट भावना बैठकीत व्यक्त झाल्याची माहिती आहे. साताऱ्यातील हॉटेल लेक व्ह्यूमध्ये झालेल्या या बैठकीत पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, शिवसेनेचे संपर्कप्रमुख शरद कणसे, ज्येष्ठ नेते संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत अनेक सदस्यांनी आपापल्या भावना स्पष्टपणे मांडल्या.
मात्र, महायुतीच्या राजकारणात भाजप सध्या बहुमताच्या जवळ असल्याने त्यांच्या भूमिकेची दखल घेणे अपरिहार्य असल्याचे मतही काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याची चर्चा आहे. ‘आम्ही महायुतीचा भाग आहोत. त्यामुळे भाजपबाबत सार्वजनिकरीत्या कोणतीही संघर्षात्मक भूमिका घेणे योग्य ठरणार नाही,” अशी राजकीय चौकट बैठकीत अधोरेखित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
यावेळी शंभूराज देसाई यांनी सर्व सदस्यांची मते आणि भावना जाणून घेत त्या जसाच्या तशा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील, असे स्पष्ट केले. अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व आणि हायकमांड स्तरावरच होणार असून मतदानापूर्वी तो सर्व सदस्यांना कळविला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत, वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल आणि त्यानुसार एकजुटीने काम केले जाईल, अशी भूमिका घेतली. त्यामुळे स्थानिक पातळीवरील मतभेद आणि चर्चांना दुय्यम स्थान देत पक्षाने निर्णयाचे सर्व अधिकार थेट नेतृत्वाकडे सोपविल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, अलीकडील संघटनात्मक नियुक्त्यांवरून जिल्ह्यात निर्माण झालेल्या नाराजीच्या चर्चांनाही या बैठकीत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शरद कणसे, संजीवराजे नाईक निंबाळकर, रणजितसिंह भोसले यांच्यासह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक एकजूट आणि महायुतीतील समन्वय यावर भर दिला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वांचे लक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतिम निर्णयाकडे लागले असून सातारा- सांगली मतदारसंघातील राजकीय गणिते पुढील काही दिवसांत अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.





