युतीमधील संशयकल्लोळानंतर विविध मुद्यांचे सुटू लागले बाण
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक जागा लढवण्याचा आग्रह धरणाऱ्या भाजपची कोंडी करण्यासाठी शिवसेना सरसावली आहे. त्यातून जागावाटपावरून भाजपला बॅकफूटवर ठेवता यावे या उद्देशातून शिवसेनेकडून विविध मुद्द्यांचे बाण सुटू लागले आहेत.
भाजप आणि शिवसेना या सत्तारूढ मित्रपक्षांमधील जागावाटपाचे घोडे सध्या अडल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांनी जागावाटपाचा वेगवेगळा फॉर्म्युला पुढे करून त्यावर ठाम राहण्याची भूमिका घेतल्याने त्यांच्यातील चर्चा थांबल्याचे बोलले जात आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. त्यातील आपण प्रत्येकी 135 जागा लढवाव्यात आणि उर्वरित 18 जागा मित्रपक्षांसाठी सोडाव्यात, असा प्रस्ताव शिवसेनेने भाजपपुढे ठेवला आहे. मात्र, भाजपकडून स्वत:ची ताकद वाढल्याचा दावा केला जात आहे. त्यातून तो पक्ष शिवसेनेला 120 पेक्षा अधिक जागा देण्यास तयार नसल्याचे समजते. त्यामुळे युती होण्याबाबतच आता साशंकता व्यक्त होऊ लागली आहे.
त्या संशयकल्लोळाच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून भाजपला फारसे शिरजोर होऊ न देण्याची रणनीती शिवसेनेने अवलंबल्याचे दिसते. त्याचाच भाग म्हणून भाजपची कोंडी करता यावी यासाठी शिवसेनेकडून मागील काही दिवसांपासून विविध मुद्दे उपस्थित केले जात आहेत. त्यात आरे कारशेड, राम मंदिराची उभारणी, इतर पक्षांमधील नेत्यांचा प्रवेश आदींचा समावेश आहे. ते मुद्दे उपस्थित करून शिवसेना एकतर भाजपपेक्षा वेगळी भूमिका मांडत आहे किंवा भाजपवर निशाणा साधण्याची संधी निर्माण करत आहे. शिवसेनेची ती रणनीती भाजपच्या ध्यानात आली आहे. त्यामुळे शिवसेनेने वास्तवाची जाणीव ठेऊन आमची ताकद वाढल्याची बाब ध्यानात घ्यावी, असा सूर भाजपमधून उमटू लागला आहे.