Shivsena: शिवसेना (शिंदे गट)च्या विभागीय आढावा बैठकीत सोमवारी जोरदार खडाजंगी झाली. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी स्वपक्षीय मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर थेट टीका केली, तर नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात स्थानिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत पराभवाचे खापर फोडले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नांदेड येथील ई-स्क्वेअर हॉलमध्ये आयोजित बैठकीस नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी साडेचारची वेळ असूनही नेतेमंडळी उशिरा आल्याने बैठक सायंकाळी सातच्या सुमारास सुरू झाली. प्रारंभी खा. शिंदे यांनी संघटनात्मक आढावा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली; मात्र तक्रारींचा सूर वाढताच वातावरण तापले. मंत्री फोन उचलत नाहीत – हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी आक्रमक भूमिका घेत काही मंत्र्यांवर थेट आरोप केले. “शिवसेनेचे काही मंत्री फोन उचलत नाहीत, भेटीसाठी वेळ देत नाहीत आणि आमच्या मतदारसंघातील प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात,” अशी तक्रार त्यांनी मांडली. संबंधित मंत्र्यांना समज देण्याची मागणीही त्यांनी खा. शिंदे यांच्याकडे केली. आमदारानेच मंत्र्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने बैठकीत काही काळ शांतता पसरली. निवडणुकीतील अपयशाचा मुद्दा – दरम्यान, नांदेडमधील शिवसैनिकांनी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी महापालिका निवडणुकीतील अपयशाचा मुद्दा उपस्थित करत, “३५०० कोटींच्या विकासकामांचा दावा केला जातो, तर मग केवळ तीनच नगरसेवक का निवडून आले?” असा सवाल केला. तिकीट वाटपातील चुका कल्याणकर यांच्या माथी मारत कार्यकर्त्यांनी थेट जबाबदारी निश्चित केली. बैठकीदरम्यान काही कार्यकर्त्यांनी वारंवार व्यत्यय आणल्याने गोंधळ वाढला. यामुळे खा. श्रीकांत शिंदे यांनी संताप व्यक्त करत गोंधळ घालणाऱ्यांची कानउघाडणी केली. “येथील परिस्थिती मला पूर्ण माहिती आहे. प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आलो आहे. त्यामुळे शिस्त पाळा,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. बैठकीच्या उत्तरार्धात मंत्री उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गटबाजी विसरून पक्षसंघटना मजबूत करण्याचे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले. या बैठकीस आमदार हेमंत पाटील, आनंदराव बोंढारकर यांच्यासह तीनही जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.