खासदार संजय राऊत यांचा दावा
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट बहूमत मिळाले असले तरी त्यांच्यातील अंतर्गत वादावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने सत्ता स्थापण करण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सत्तास्थापनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. शिवसेनेकडे 175 आमदारांचे संख्याबळ असून, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. तसेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल आणि सेनेच्या मुख्यमंत्र्याचा शिवतिर्थावर शपथविधी होईल, असा दावा राऊत यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या आग्रहामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नाही. शिवसेना मागणीवर ठाम असताना भाजपाकडून मात्र, मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटपावर कोणतीही तडजोडीची भूमिका घेताना दिसत नाही. त्यात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून देणारी माहिती दिली आहे. संजय राऊत म्हणाले, शिवसेनेला पाठिंबा देणारी संख्या वाढली आहे. कालपर्यंत 170 होती, ती आज 175 पर्यंत आली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शिवसेना मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा आहे आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतिर्थावर शपथ घेईल. उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत पोहोचले असून, लवकरच गणित माध्यमांसमोर मांडण्यात येईल,असा दावा त्यांनी केला आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, देशाचे गृहमंत्री अमित शहा हे काळाची पाऊले ओळखणारे नेते आहेत. म्हणूनच त्यांनी परिस्थिती ओळखून युती केली. राज्यातील सत्तेच्या वाटाघाटी त्यांच्यासमोर झाल्या आहेत. मात्र, सध्या शहा यांचे मौन रहस्यमय आहे. हरयाणासारख्या छोट्या राज्यातील तिढा सोडवण्यासाठी शाह यांनी पुढाकार घेतला. हीच गोष्ट महाराष्ट्रात का नाही?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, सत्तेच्या तिढ्यात शरद पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, शरद पवार राज्याच्या राजकारणात येणार नाही. शरद पवार मुख्यमंत्रीपदापेक्षा मोठे आहेत,असे त्यांनी सांगितले.