औरंगाबाद – औरंगाबादच्या वाळूज भागात सोमवारी सायंकाळच्या सुमारास शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाली. बाकडे तोडल्याच्या प्रकरणावरून झालेल्या या हाणामारीमुळे चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अद्याप पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
हाणामारीत एकाच्या डोक्याला मार लागल्याने त्याला उपचारासाठी घाटीमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सदर घटना ही ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून झाली असल्याची माहिती मिळाली आहे. कारण, वाळूज एमआयडीसीमधील बजाजनगर वडगाव कोल्हाटी इथल्या वॉर्ड क्रमांक तीनमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी युवा सेनेचे आणि भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी इच्छुक आहेत.
त्यामुळे, होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांकडून जंगी तयारी सुरु आहे. होर्डिंग लावणे, परिसरात कार्यक्रम घेणे असे कार्यक्रम युवा सेनेचे आणि भाजप युवा मोर्चा कडून घेतले जात असल्याने दोन्ही दोन्ही गटांत धुसफूस सुरु आहे.ग्रामपंचायत निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर भाजपच्या पंचायत समिती सदस्याच्या पुढाकारातून रांजणगाव येथील लोकमान्य चौकात सिमेंटचे चार बाकडे बसवण्यात आले होते.
यासाठी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने पुढाकार घेतला होता. मात्र, सोशल मिडिया वरती अज्ञात लोकांनी हे बाकडे तोडले असल्याची पोस्ट फिरू लागली. त्यानंतर वातावरण तापले होते. हे बाकडे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यानेच तोडले असा समाज भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरली यानंतर बाकडे तोडल्याचा जाब विचारण्यासाठी पाच ते सहा कार्यकर्ते लोकमान्य चौकात गेले असता तिथे युवा सेना आणि युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची सुरु झाली आणि त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले.