Shirur Satyagraha – शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आशीर्वादाने येत्या १५ एप्रिलपासून शिरूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत सत्याग्रह आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यात वाढलेले ड्रग्सचे जाळे, गोळीबाराच्या घटना आणि अवैध धंद्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायद्याचे राज्य धोक्यात आल्याची भावना निलेश वाळुंज यांनी व्यक्त केली आहे. तालुक्यात एमडी ड्रग्सचा सुळसुळाट, बंदूक फायरिंग, अवैध उत्खनन आणि चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही योग्य दखल घेतली जात नसल्याचा आरोप वाळुंज यांनी केला आहे. यापूर्वी समाजघातक प्रवृत्तींकडून त्यांना धमक्या मिळाल्या असून त्यांच्या दुचाकीला आग लावण्याचाही प्रकार घडला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने १० एप्रिल रोजी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे हा विषय पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे. या सत्याग्रहाच्या माध्यमातून वाळुंज यांनी अनेक प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये शिरूरसाठी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकांची नियुक्ती, आयपीएस दर्जाच्या डीवायएसपी अधिकाऱ्यांची नेमणूक, एमडी ड्रग्स प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी आणि शिरूर शहरासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती यांचा समावेश आहे. तसेच रिक्त पोलीस पदे भरून अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी फ्लाइंग स्क्वॉड तयार करण्याची मागणीही करण्यात आली आहे. हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून समाजाच्या सुरक्षेसाठी आणि कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी असल्याचे वाळुंज यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे आता राज्य पातळीवरूनही शिरूरच्या गुन्हेगारी प्रश्नांकडे लक्ष वेधले जात असून १५ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या सत्याग्रहाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.