Shirur Police Station – शिरूर शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा समोर आले. शिरूर पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गटांमध्ये झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याने परिसरात खळबळ उडाली. अर्वाच्च्य शिवीगाळ, महिलांच्या किंचाळ्या आणि आरडाओरडामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटातील व्यक्ती पोलीस ठाण्यात आले होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास बोलाचाली सुरू होऊन वाद चिघळला. यावेळी महिला-पुरुषांनी एकमेकांना शिवीगाळ करत हातघाई केली. महिलांनीही आक्रमक भूमिका घेतल्याने परिस्थिती अधिकच बिघडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिसांसह कर्मचार्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने गोंधळ वाढत गेला. अखेर अतिरिक्त पोलिस कुमक दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांनी दोन्ही गटांची समज काढत वाद शांत केला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, अवघ्या पाच दिवसांपूर्वीही पोलीस ठाण्याच्या आवारात दोन गटांमध्ये धुमश्चक्री व दगडफेक झाली होती. त्या प्रकरणातील काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असले, तरी मुख्य सूत्रधारांवर कारवाई न झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. काही नावे वगळण्यासाठी आर्थिक तडजोड झाल्याचीही चर्चा रंगली आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांचा प्रभाव आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था याविरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी गेल्या पाच दिवसांपासून तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले व पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी आंदोलकांशी चर्चा केली असली, तरी अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.