प्रभात वृत्तसेवा शिरुर – शासकीय आयुष्यमान भारत योजना तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असतानाही अपघातग्रस्त गोरगरीब रुग्णांकडुन बळजबरीने हजारो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार शिरुर येथे उघडकीस आला आहे. अपघातग्रस्तांना मोफत उपचार नाकारत हजारो रुपये उकळल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात शिरुर येथील रुबी हॉल क्लिनिक (ग्रँट मेडिकल फाउंडेशन संलग्न) आणि मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे तसेच पत्रकार अमोल बोरगे यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील सयाजी तबाजी आडगळे तसेच त्यांच्या पत्नी सारीका सयाजी आडगळे यांना शुक्रवार (दि.१९) रोजी ट्रॅक्टरने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात सयाजी आडगळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने १९ टाके घालावे लागले.जखमींना शिरुर येथील रुबी हॉल क्लिनिक (ग्रँट मेडिकल फाउंडेशन संलग्न) आणि मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल या रुग्णालयात दाखल केले. आयुष्यमान कार्ड असुनही “कार्ड चालत नाही”, “या कार्डवर उपचार होत नाहीत” असे सांगत मोफत उपचार नाकारण्यात आले. याउलट दोन्ही रुग्णांचे मिळुन ७० हजार रुपयांचे बिल आकारल्याचा आरोप केला आहे. काही रक्कम रोख स्वरुपात वसुल केल्याचाही गंभीर आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाचे मुख्य प्रशासक मायकेल पॉल यांनी सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे तसेच अमोल बोरगे यांच्याशी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनालाही पाचारण केले. मात्र, औषधांचे वाढीव दर व रुग्ण शासकीय योजनेस पात्र असल्याचे ठोस पुरावे समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला कर्मचारी व रुग्णांसमोर माफी मागावी लागली, अशी खात्रीलायक सुत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान, संघर्षामुळे अडगळे कुटुंबाचे तब्बल ५० हजार रुपये वाचले असून, संबंधित कुटुंबाने भारतीय बहुजन पालक संघाचे आभार मानले आहेत.