प्रभात वृत्तसेवा जांबूत – पिंपरखेड (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या रोहन बोंबे (वय 13) याचा भाऊ ऋतिक याची नोकरीची जबाबदारी मी स्वतः घेतो, असे आश्वासन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले.शुक्रवारी (दि. 7) पिंपरखेड येथे जाऊन बोंबे कुटुंबियांची भेट घेत त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांनी सांत्वनपर भेट दिली. या वेळी राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, तसेच अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आढळराव पाटील म्हणाले की, अन्न-पाण्याच्या शोधात बिबटे मानवी वस्त्यांकडे वळत असून त्यामुळे परिसरात भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील चार-पाच वर्षांत सुमारे दहा जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून यावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी आम्ही राज्याचे वनमंत्री गणेश यांच्याशी चर्चा केली आहे. बोंबे कुटुंबीयांविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, हे माझे जवळचे कुटुंब असून, त्यांच्या घराची दुरावस्था लक्षात घेता शासनस्तरावरून तत्काळ मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच या वस्तीवरील रस्त्याचा प्रश्न पुढील दोन दिवसांत मार्गी लावला जाईल. यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दोन दिवसांत रस्त्याचे इस्टीमेट तयार करून कामाला सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या.