प्रभात वृत्तसेवा न्हावरे – करडे ते कारेगाव या दोन गावांना जोडणारा मुख्य रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. एक-दोन नव्हे, तर तब्बल ३०० पेक्षा अधिक खड्ड्यांनी हा सहा किलोमीटरचा मार्ग विद्रूप झाला असून, रांजणगाव औद्योगिक वसाहतीकडे दररोज प्रवास करणाऱ्या कामगार आणि वाहनचालकांचे मोठे हाल होत आहेत.प्रत्येक दहा-पंधरा फूटांवर खोल खड्डे निर्माण झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत पावसाळ्यामुळे रस्त्याची दुरवस्था अधिकच गंभीर बनली आहे. करडे ते बाभुळसर शिव या चार किलोमीटर अंतरावर २४० खड्डे आणि बाभुळसर शिव ते कारेगाव या दोन किलोमीटर अंतरावर ६० खड्डे पडले आहेत. या दोन्ही रस्त्याचे काम वेगवेगळ्या ठेकेदारांनी केले आहे. शेतकरी संघटनेचे बापुसाहेब शिवले यांनी या रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, हेच कळत नाही,” असे म्हटले आहे. याबाबत शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बाबासाहेब गाडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी रस्त्याची पाहणी केली असून, लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगितले.