Shirur News – शिरूर तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तब्बल ५४ एकर गायरान जमिनीवर वृक्षारोपण करण्याच्या निर्णयावरून गावात मोठा वाद निर्माण झाला आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स यांच्या सीएसआर फंडातून तसेच साद फाउंडेशनच्या माध्यमातून या जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, बुधवारी (दि. २०) सकाळी दहाच्या सुमारास या कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडत असताना वाद उफाळला. शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते अनिल माणिक पवार यांनी भर कार्यक्रमात एकतर्फी कारभाराबाबत जाब विचारल्याने काही वेळ मोठा गोंधळ निर्माण झाला. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गावाच्या मालकीची ५४ एकर गायरान जमीन ही भविष्यातील सार्वजनिक प्रकल्प, खेळाचे मैदान, शासकीय योजना व इतर विकासकामांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे संपूर्ण जमीन वृक्षारोपणासाठी वापरण्याऐवजी किमान ५० टक्के जमीन राखीव ठेवावी, अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी अनिल पवार आणि ग्रामस्थांनी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी महेश डोके तसेच चिंचणी ग्रामपंचायतीला लेखी निवेदन दिले होते. मात्र, निवेदन दिल्यानंतरही ग्रामपंचायतीने जवळपास ६० टक्के क्षेत्रावर वृक्षारोपण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, ग्रामस्थांचा आवाज डावलून एकतर्फी कारभार केला जात असल्याचे अनिल पवार यांनी म्हटले आहे. या वादाबाबत चिंचणी गावचे प्रभारी ग्रामसेवक सुरेश साळवे यांच्याशी संपर्क साधला असता, चार महिन्यांपूर्वी चिंचणी गावची जबाबदारी माझ्याकडे आली असून मी येण्यापूर्वीच गायरान जमिनीत वृक्षारोपण करण्याबाबत विशेष ग्रामसभा घेऊन पूर्वीच्या ग्रामसेवकांनी ठराव घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. चिंचणीच्या माजी सरपंच आणि प्रशासक परिघा पवार यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून एलआयसी हाऊसिंग फायनान्स व साद फाउंडेशनच्या माध्यमातून ५४ एकर गायरान जमिनीवर वृक्षारोपण करण्याबाबत सर्व कागदपत्रांची पूर्तता आम्ही केलेली आहे. अनिल पवार यांनी १२ दिवसांपूर्वी ५० टक्के जागेत झाडे लावण्याबाबत निवेदन दिले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.