जांबुत : राज्यात शनिवार, ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाचा मंगलमय समारोप झाला. शिरूर तालुक्यातील काठापूर खुर्द, पिंपरखेड, जांबुत, वडनेर खुर्द, चांडोह, फाकटे आदी गावांमध्ये “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असा जयघोष करत लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. घोडनदी, कुकडी नदी आणि विविध तलावांच्या विसर्जन स्थळांवर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. काही गणेश मंडळांनी पाच किंवा सात दिवसांनी, तर काहींनी दहाव्या दिवशी गणरायाचे विसर्जन केले. गणेशोत्सवात अनेक मंडळांनी कीर्तन, प्रवचने आणि महिलांसाठी खेळांचे आयोजन करत उत्सवाला आनंदाची झालर जोडली. पिंपरखेड येथील जय मल्हार नवतरुण गणेश मंडळाच्या ढोल-ताशा आणि लेझीमच्या गजरातील मिरवणूक विशेष आकर्षण ठरली. तर, युवाशक्ती गणेश मित्र मंडळाने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील उपोषणाचे जिवंत क्षणचित्र सादर करत सामाजिक संदेश दिला. परिसरातील सर्व गणेश मंडळांनी सामाजिक ऐक्याचा संदेश देत उत्साहात गणरायाला निरोप दिला.