जांबूत : गेली तीन दिवस सतत पडणाऱ्या संततधार पावसामुळे हुतात्मा बाबू गेनू जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग घोडनदीपात्रात करण्यात आल्याने घोडनदीला प्रचंड महापूर आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुलावरून पाणी जाऊन रस्ते बंद झाले असून गावांचा संपर्कही तुटला आहे. पुराच्या पाण्याची तीव्रता पाहता सुमारे तीस तासांहून अधिक काळ तास उलटूनही बेल्हे- जेजुरी राज्यमार्गावरील चांडोह (ता.शिरूर) – लाखणगाव पूल हा अद्यापही पाण्याखाली असल्याने वाहतूक मात्र बंद ठेवण्यात आली असून पाण्याच्या तीव्रतेने पुलावरील डांबर वाहून गेल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सध्या घोडनदी पात्रातील पाण्याचा विसर्ग हा वाढता असून रविवारी (दि.२८) रोजी सकाळी दहा वाजल्यापासून पूलावरून प्रचंड पाणी वाहत असून पुलाचे स्लॅब बांधकामाला जोरजोराने आदळत असल्याचे भयावह वास्तव मात्र दिसून येते. पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात वाहून आलेल्या जलपर्णी पूलाच्या संरक्षण कठड्याला अडकलेल्या असून दुसऱ्या दिवशी देखील हा पूल पाण्याखाली असल्याने पुलावरील डांबर पूर्णपणे वाहून गेले आहे. संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पुलाला पडलेल्या भेगा, खड्डे यामुळे पूल धोकादायक बनला असून दुसऱ्या दिवशीही सलग पुलावरून पाणी चालू असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांच्या सूचनेवरून पोलीस कॉन्स्टेबल मनोज मोरे, मंडलअधिकारी राजेंद्र पोटकुले, ग्राममहसूल अधिकारी सुग्रीव मुंढे, कोतवाल सारिका वरे, चांडोह गावचे कर्तव्यदक्ष पोलिस पाटील सुदर्शन भाकरे, पिंपरखेडचे पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे यांचेकडून दोन दिवसांपासून परिस्थितीची पाहणी करण्यात येत असून पोलीस पाटील सुदर्शन भाकरे यांनी पुलाची दुरावस्था झाल्याचे व हादरे बसत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत तातडीने वाहतूक बंद केली आहे. पुलाच्या स्लॅबला जोराने पुराचे पाणी आदळत असल्याने पुलाच्या खालून प्रवाहाने झालेल्या नुकसानीचा अंदाज येत नाही परिणामी पुलावरुन वाहतूक सुरू राहिल्यास एखादी दुर्घटना घडू शकते. प्रशासनाकडून या राज्यमार्गावरील वाहतूक बंद करण्यात येऊन पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. चांडोह गावचे पोलिस पाटील सुदर्शन भाकरे दोन दिवस या पूर परिस्थितीकडे लक्ष ठेऊन आहेत.