शिरूर – शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील म्हसोबा वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मालकीच्या जागेवर शेतकरी सदाशिव भोसले यांनी बेकायदेशीरपणे नांगरणी करून अतिक्रमण केले असून, शाळेच्या पिण्याच्या पाण्याच्या बोअरचेही मोठे नुकसान केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी असलेला एकमेव रस्ता कंपाउंड टाकून बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सदर व्यक्तीने शालेय परिसरातील झाडे तोडली असून शाळेचे कंपाउंडही नुकसान केल्याची तक्रार वनविभागाकडे करण्यात आली आहे. या प्रकारामुळे गावात संतापाची लाट उसळली असून शालेय व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सरपंच व पोलीस पाटील यांनी शिरूर पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देऊन संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा रस्ता बंद झाल्यामुळे मुले वर्गात बसू शकत नाहीत. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास येत्या दि. २ पासून तहसीलदार कार्यालयासमोर विद्यार्थ्यांना घेऊन शाळा भरवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी जाहीर केला आहे. “शाळेची जागा ही सार्वजनिक मालमत्ता आहे. त्यावर अतिक्रमण करून मुलांच्या शिक्षणावर घाला घालणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून अतिक्रमण हटवावे, नुकसानभरपाई व दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. या प्रकरणाकडे शिक्षण विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासन लक्ष देणार का, की विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे.