प्रभात वृत्तसेवा शिरूर – नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरातील प्रभाग ३ व संपूर्ण शहरामध्ये मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळत आहे. दोन वेळा नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष पद भूषवलेल्या अनुभवी महिला उमेदवारांनी यंदा पुन्हा नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहत निवडणूक रिंगणात उडी घेतली असली, तरी त्यांच्या कार्यकाळातील विकासकामांबाबत प्रभागातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. गत दोन कार्यकाळात रस्ते, गटारव्यवस्था, पाणीपुरवठा, प्रकाशव्यवस्था यांसारख्या मूलभूत सोयींमध्ये कुठलाही ठोस बदल दिसून न आल्याने मतदारांमध्ये नाराजी वाढली आहे. प्रभागासह शहराच्या सर्वांगीण विकासात ग्रहण लागल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले. यामुळेच सत्ता नसलेल्या पक्षाकडून उमेदवारी घेऊन त्यांनी नगराध्यक्षपदाची लढत स्वीकारली तरी मतदारांचा उत्साह मात्र अपेक्षेप्रमाणे दिसत नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांच्या प्रचारात रंगत आली असून तरुणाईपासून महिलांपर्यंत आणि विविध समाजघटकांमध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ऐश्वर्या पाचर्णे प्रचारात आघाडी घेत आहेत. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे, स्वच्छता, पाणीपुरवठा, स्मार्ट प्रशासन, पर्यटन संधी, महिला-सुरक्षा व युवा विकास यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत त्यांनी आक्रमक प्रचार यंत्रणा उभी केली आहे.दुसरीकडे, दोन वेळा सत्तेत राहूनही प्रभागाला अपेक्षित विकास न दिल्याचा ठपका अनुभवी उमेदवारांवर ठेवत विरोधक तीव्र टीका करत आहेत. निवडणुकीचे काही दिवस शिल्लक असताना दोन्ही बाजूंकडून प्रचाराला वेग आला आहे, मात्र जनतेच्या अपेक्षा, तरुणांचा उत्साह आणि शहर बदलण्याच्या आशेचा मुद्दा पाहता शर्यत ऐश्वर्या पाचर्णे यांच्या बाजूने झुकणार काय, याकडे लक्ष लागून राहिले आहे.