न्हावरे(प्रतिनिधी) : न्हावरे(ता. शिरूर)येथे मोलमजुरी करणाऱ्या महिलेवर रात्रीच्या वेळी अज्ञात इसमाने हल्ला करून त्या महिलेचा एक डोळा काढला तर दुसऱ्या डोळ्याला हल्ला करताना जोरदार इजा केली होती. त्यामुळे उपचारा दरम्यान त्या महिलेचा दुसरा डोळाही कायमस्वरूपी निकामी झाला आहे.या घटनेला पाच दिवस उलटून गेले.मात्र,अद्यापपर्यंत आरोपी शोधण्यास पोलिसांना यश आले नसून,न्हावरे परिसरात महिला व तरुणींमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख व त्यांच्या इतर अधिकाऱ्यांनी सलग दोन दिवस न्हावरे दुरक्षेत्र पोलीस ठाण्यात तळ ठोकला होता.परंतू,आजपर्यंत आरोपीचे धागे दोरे हाती लागले नसून,पोलीस यंत्रणेच्या हाती अपयश आले आहे.यामुळे परिरातून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय घेतला जात आहे.याबाबत शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही काल(दि.०७)प्रत्यक्ष न्हावरे येथे घटनास्थळी जाऊन पोलीस यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त केली होती.
“पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असून,लवकरच आरोपीला गजाआड करू असे प्रवीण खानापुरे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
-प्रवीण खानापुरे (पोलीस निरीक्षक – शिरूर)
आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून,पोलीस यंत्रणा व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांना अपयश येत आहे. अशी माहिती पुढे आली आहे. मात्र, पोलिसांकडून संशयितांना अटक करण्याचे सत्र सलग पाचव्या दिवशीही सुरूच आहे. असे असतानाही पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागत नसल्याने पोलीस यंत्रणा कमालीची दबावाखाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात या घटनेने खळबळ उडाली असून,सर्वच राजकीय पक्षांच्या नेते मंडळींनी विविध स्वरूपाची मदत पीडित महिलेला व तिच्या कुटुंबाला केली.मात्र, तिच्यावर उपचारासाठी कोणीही विशेष प्रयत्न केले नाहीत.याची खंत असल्याचे काही महिला संघटनांनी बोलताना सांगितले.