कराड – पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यात सिंचनासाठी तब्बल 70 हजार कोटी रुपये निधी देण्यात आला. मात्र, त्यातील एक टक्काही निधी सिंचनावर खर्च झाला नसल्याचे निदर्शनास आल्याने स्वतः चव्हाण यांनी याबाबत शेतपत्रिका काढण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या खाजगी कार्यक्रमासाठी गावी आले असतानाही, त्यांनी 62 फायलींचा निपटारा केला. आमच्या कामाचा वेग चांगलाच आहे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य आणि सरकारी तिजोरीचा विचार करून निर्णय घेतले जात आहेत. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, तशीच परिस्थिती असून शिंदे सरकार गतिमानच आहे, असे उत्पादन शुल्क आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, कर्नाटकातील निवडणुकीत प्रचारासाठी गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अजितदादा पवारांनी केलेल्या टीकेचा समाचारही देसाई यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांना कर्नाटकात मागणी आहे, तशी मागणी अजितदादांना नसेल, असा टोला त्यांनी लगावला. आगामी निवडणुकीत शंभर जागा निवडून आणण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले कराड येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात सध्या हजारो फायली प्रलंबित असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार त्यावर निर्णय का घेत नाही, या प्रश्नाचे उत्तर देताना, मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्णय गतिमानच असल्याचे देसाई यांनी ठामपणे सांगितले. कर्नाटक विधानसभा निवडणूक शिवसेना का लढवत नाही, या प्रश्नावर देसाई म्हणाले, शिवसेनेचे प्राबल्य महाराष्ट्रात असून, आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या शंभर जागा निवडून आणण्याचे प्रयत्न आहेत. राज्यातील जागावाटपाचा निर्णय शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे घेतील.
भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या चर्चेनंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचारासाठी गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अजित पवार यांनी टीका केली होती. त्याबाबत छेडले असता, ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांना या आधी मंत्री म्हणून दहा वर्षांच्या कामाचा मोठा अनुभव आहे. शिवसेनेची भाजपसोबत युती असल्याने, मुख्यमंत्री कर्नाटकमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी गेले होते. त्यांना तेथे मागणी आहे; परंतु माजी उपमुख्यमंत्र्यांना तेथे मागणी नसेल. त्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले असावे.
“शिवसेना म्हणा’, मग उत्तर देतो
आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिंदे गटाची भूमिका काय राहील, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर, आधी शिवसेना म्हणा मग उत्तर देतो, असे देसाई यांनी बजावले. आमची बाजू भक्कम आहे. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केल्याने अपात्रतेची आम्हाला भीती नाही. कायद्याने शिवसेना व धनुष्यबाणाची मान्यता आमच्याकडेच आहे. त्यामुळे शिवसेना आमचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.