मुंबई -रवी शास्त्रीकडे तरुण खेळाडूंना योग्य दिशा देण्याचे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याची क्षमता आहे, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची प्रशंसा केली आहे. “1971 : द बिगनिंग ऑफ इंडियाज क्रिकेटिंग ग्रेटनेस’ या पुस्तकाच्या ऑनलाइन सोहळ्यात ते बोलत होते.
गावसकर म्हणाले, शास्त्रींसोबत प्रॅक्टीस सेशनमध्ये 10 ते 15 मिनिटे घालवल्यानंतर तरुण खेळाडूंना आत्मविश्वास निर्माण करण्याची त्यांची क्षमता तुम्हाला लक्षात येईल. जर त्यांना (शास्त्री) एखाद्या खेळाडूच्या क्षमतेवर विश्वास असेल, तर त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शास्त्रींपेक्षा दुसरी कोणतीही चांगली व्यक्ती नाही. ते तुम्हाला रागवतील, पण त्याचबरोबर स्वत:ला चांगलं करण्यासाठी काय करावे लागेल हेदेखील सांगतील.
यावेळी सुनील गावसकर यांनी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांचीही प्रशंसा केली. त्यांनी यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे उदाहरण दिले. “ऑस्ट्रेलियात दुसऱ्या टप्प्यात चांगली कामगिरी करणाऱ्या कोणत्याही फास्ट बॉलर्सशी तुम्ही चर्चा केली तर ते भरत यांची प्रशंसा करतील. त्यांनी कसे मार्गदर्शन केले हे सांगतील, असेही गावसकर म्हणाले.
तरुण खेळाडूंनी शास्त्री आणि अरुण यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा. कारण स्वत:बद्दलचा संभ्रम दूर करून योग्य मार्ग दाखवण्यासाठी त्यांच्यापेक्षा दुसरं कुणीही चांगलं नाही, असा सल्ला गावसकर यांनी दिला आहे.
दरम्यान, रवी शास्त्री भारताच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक असताना भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन मालिका जिंकल्या आहेत. हा ऐतिहासिक विक्रम करणारे ते एकमेव भारतीय प्रशिक्षक आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये मर्यादित ओव्हर्सची मालिकादेखील जिंकली होती.
शास्त्री मुख्य प्रशिक्षक असतानाच भारताने 2019च्या वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. त्याचबरोबर यावर्षी जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येदेखील प्रवेश केला आहे.