प्रभात वृत्तसेवा पुसेगाव – महायुती सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे आणि घेत असलेल्या निर्णयामुळे संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे खालावली असल्याचे मत राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.खातगुण (ता. खटाव) येथे नव्याने बांधलेल्या शिवकल्याण ग्रामसंसद व आरोग्यदीप आरोग्य उपकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, विधानभवन निवृत्त कक्ष अधिकारी प्रवीण लावंड, बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र कचरे, जोतीनाना सावंत, गौरव जाधव, आरोग्य उपकेंद्राच्या प्रमुख डॉ. सविता वाघ, सरपंच अमिना सय्यद, चेअरमन नानासो लावंड, मनोज देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. आ. शशिकांत शिंदे म्हणाले, ‘सर्व सामान्य जनतेमध्ये सध्याच्या सरकार विरोधात मोठा राग आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली असून सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. अनेक योजनामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असून जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे.’येणाऱ्या सर्व निवडणुकीत सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन श्रीनिवास पाटील यांनी केले. प्रभाकर घार्गे म्हणाले, ‘राज्यातील एकमेव उदाहरण असेल की या गावात राम आणि रहिम एकत्र नांदत आहेत. राजकारणात सत्ता येत असते, जात असते. परंतु, गावाचा विकास, समाजाचा विकास ही भावना मनामध्ये ठेवून काम करायचे असते. खातगुण गावाने एवढया वादळात सुद्धा आपला दिवा चांगला तेवत ठेवला. त्याबद्दल सर्वांचे कौतुक केले पाहिजे.’ राम रहिम संघटनेचे प्रमुख वसंतराव जाधव गुरुजी प्रास्ताविकामध्ये म्हणाले, ‘चार वर्षापूर्वी सरकार आमचं, सत्ता आमची होती. त्यावेळी या इमारतीला नवीन बांधकामासाठी निधी मंजूर झाला. त्यावेळी या इमारतीचे भूमीपूजन श्रीनिवास पाटील व आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते झाले होते. तर आज या इमारतीचे उद्घाटन याच मान्यवरांच्या हस्ते होत असून या इमारतीत गावातील सर्वांचीच शासकीय कामे एकाच छताखाली होणार आहेत.’ अर्जुन जाधव, दादा मुळे यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच आनंदराव लावंड यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिवाजी लावंड, यशवंत लावंड, विजय लावंड, संजय पवार, सीताराम लवंड, ग्रामसेवक विनोद बनकर, मंदाकिनी लावंड, मनीषा माने, काजल जाधव, अलका पवार, श्रीमती आश्विनी, उज्वला माने आदींसह ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी, राम रहिम संघटना आणि पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरी आणून गावातील स्मशानभूमी सिमेंट क्रॉकेट रस्त्यासाठी स्वखर्चातून १५ लाख रुपये दिल्याबद्दल विधान भवन निवृत्त कक्ष अधिकारी प्रवीण लावंड यांचा ग्रामस्थांच्यावतीने विशेष सत्कार झाला. तर गुराखी व ओलाफोक पुस्तक लिहिल्याबद्दल साहित्य रत्न पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल संभाजी लावंड यांचा आणि पोलीस उपअधीक्षक विवेक लावंड व लष्करातील सेवानिवृत्त रामदास लावंड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.