Share Market Today: जागतिक तणावामुळे दिवसाची सुरुवात घसरणीने झाल्यानंतरही शेवटच्या तासात झालेल्या जोरदार खरेदीमुळे भारतीय शेअर बाजार गुरुवारी हिरव्या निशाणात बंद झाले. बीएसई सेन्सेक्स 185 अंकांनी वाढून 73,320 वर बंद झाला, तर निफ्टी 34 अंकांनी वधारत 22,700 चा टप्पा पार केला. दिवसाच्या सुरुवातीला दोन्ही निर्देशांक सुमारे 2 टक्क्यांपर्यंत घसरले होते. मात्र दुपारनंतर खरेदी वाढल्याने बाजारात जोरदार पुनरागमन झाले. या तेजीमागे आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्सची खरेदी आणि रुपयातील मोठी मजबुती हे प्रमुख कारण ठरले. एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एचसीएल टेक, टीसीएस, आयसीआयसीआय बँक आणि टेक महिंद्रा या प्रमुख शेअर्समध्ये चांगली वाढ नोंदली गेली. निफ्टी आयटी निर्देशांक सुमारे 2.4 टक्क्यांनी वाढला. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या उपाययोजनांमुळे रुपयात तब्बल 12 वर्षांतील सर्वात मोठी उसळी दिसली. रुपया 171 पैशांनी म्हणजेच 1.80 टक्क्यांनी मजबूत होत 93.10 प्रति डॉलरवर पोहोचला. यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढून बाजाराला आधार मिळाला. बाजार भांडवल 422.16 लाख कोटी रुपयांवर – आजच्या तेजीमुळे बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 422.16 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मागील सत्रात ते 422.01 लाख कोटी रुपये होते. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे ₹15,000 कोटींची वाढ झाली. सेन्सेक्समधील 30 पैकी 18 शेअर्स वाढीसह बंद झाले. एचसीएल टेकमध्ये 3.47 टक्क्यांची सर्वाधिक वाढ झाली. त्यापाठोपाठ टेक महिंद्रा, इन्फोसिस, टीसीएस आणि एचडीएफसी बँक यांच्यात 1.33 ते 2.51 टक्क्यांची तेजी दिसली. दुसरीकडे, एशियन पेंट्स हा 2.35 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वात मोठा तोट्यात राहिला. याशिवाय इटरनल, सन फार्मा, एनटीपीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या शेअर्समध्येही 1.27 ते 1.94 टक्क्यांची घसरण झाली. बीएसईवर एकूण 4,387 शेअर्समध्ये व्यवहार झाले. त्यापैकी 2,663 शेअर्स वाढीसह, 1,565 शेअर्स घसरणीसह, तर 159 शेअर्स स्थिर बंद झाले. आज 57 शेअर्सनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर 157 शेअर्सनी नीचांक नोंदवला. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतर सकाळी बाजारावर दबाव होता. तरीही दिवसाअखेरीस झालेल्या रिकव्हरीमुळे बाजार सावरले. तथापि, आठवडाभरात बाजार सुमारे 0.6 टक्क्यांनी खाली आहे आणि सलग सहाव्या आठवड्यात घसरणीचा कल कायम आहे. त्यामुळे येत्या काळात जागतिक घडामोडी, रुपयातील हालचाल आणि कंपन्यांचे तिमाही निकाल यावर बाजाराची दिशा अवलंबून राहणार असून अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.