मुंबई : कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर करण्याबरोबरच दुसर्या तिमाहीतील भारताचा विकासदर 7 % पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आता गृहीत धरण्यात येत आहे. अमेरिकेसोबतचे मतभेद संपुष्टा देण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे अमेरिकेला निर्यात करणार्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात बरीच वाढ झाली आहे. त्यात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा जास्त समावेश आहे. अशा परिस्थितीत बुधवारी शेअर बाजाराचे निर्देशांक बर्याच प्रमाणात वाढले. देशातील संस्थागत गुंतवणूकदार सध्या आक्रमक खरेदी करीत असल्याचे दिसून येते. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 513 अंकांनी वाढून 85,180 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 142 अंकांनी म्हणजे 0.55 टक्क्यांनी वाढून 26,052 अंकावर बंद झाला. एचसीएल टेक, इन्फोसिस, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर, सन फार्मा, टायटन या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स, मारुती, अदानी पोर्टस्, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. अमेरिकेबरोबर लवकरच व्यापार करार होणार असल्याचे संकेत अमेरिकेतून आणि भारतीय वाणिज्य मंत्रालयातून मिळत आहेत. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी मंगळवारी संतुलित स्वरूपाचा करार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. स्वतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चा समाधानकारक होत असून लवकरच भारतावरील आयात शुल्क कमी करण्याची शक्यता गेल्या आठवड्यात दोन वेळा व्यक्त केली आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री मंदावली असून मंगळवारी या गुंतवणूकदारांनी 728 कोटी रुपयांच्या शेअरचे विक्री केली. सध्याच्या परिस्थितीचा जास्तीत जास्त फायदा देशातील संस्थागत गुंतवणूकदार करून घेत असून या गुंतवणूकदारांकडून आक्रमक खरेदी चालू आहे. मंगळवारी या गुंतवणूकदारांनी 6,156 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.खनिज तेलाचे दर कमी आहेत. भारताची स्थूल अर्थव्यवस्था भक्कम आहे. अशा परिस्थितीत लवकरच निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी पूरक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सध्याच्या कमी पातळीवर खरेदी केलेल्या देशातील संस्थागत गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होईल असे समजले जाऊ लागले आहे.