जळगाव – अजित पवार शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत गेल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांनी जळगावमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्यासह केंद्रातील भाजपवर देखील सडकून टीका केली. नऊ वर्षात मोदींनी केवळ फोडाफोडीचे राजकारण केले असं देखील पवार यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजपने केलेल्या यंत्रणांच्या वापराबाबत देखील सवाल उपस्थित केला.मोदींनी नऊ वर्षात केवळ फोडाफोडीचे राजकारण केले अशी टीका यावेळी पवार यांनी केली. ते म्हणाले,”सध्या देशात नरेंद्र मोदींचं राज्य आहे. त्यांना सत्तेत येऊन नऊ वर्षे झाली, या काळात मोदींनी काय केलं? त्यांनी फक्त इतर राजकीय पक्षांना फोडण्याचं काम केलं. त्यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. त्यांनी फक्त एकच गोष्ट केली, ती म्हणजे फोडाफोडीचं राजकारण.
लोकांना दिलेली सत्ता लोकांच्या कल्याणासाठी वापरायला हवी पण आज भाजपने सत्तेचा गैरवापर केला आहे. भाजपने अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. माझं पंतप्रधान मोदींना एकच सांगणं आहे,जर कोणी चुकीचं काम केलं असेल तर त्याविरोधात तुम्ही खटला भरा, त्याची चौकशी करा आणि जर खोटं ठरलं तर त्याची सजा तुम्ही काय घेणार.. हे संपूर्ण देशाला सांगा असं पवार यावेळी म्हणाले.
अनिल देशमुख यांचा दावा
“शिवसेनेचे आमदार ते कशामुळे फुटले, त्यांना कशाचं आमिष दाखवलं, काय दिलं? 50 खोके एकदम ओके. 50 खोके घेऊन हे आमदार भाजप सरकारमध्ये सामील झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपच्या लक्षात आलं की हे आमदार सामील झाले तरी आपल्याला जसा फायदा व्हायला पाहिजे तसा फायदा न होता, याउलट तोटा झाला, हे जेव्हा भाजपच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी दुसरा प्रयोग केला”, असा दावा अनिल देशमुख यांनी केला.