रत्नागिरी – मला असं वाटतं, शरद पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता. परंतु अजित पवार त्या दिवशी जे वागले ते पाहून शरद पवारांनी त्यांचा निर्णय बदलला असावा. राजीनामा दिला त्या दिवशी अजित पवार कार्यकर्त्यांशी कसे वागले ते आपण पाहिले. ए तू गप्प बस, ए तू शांत बस. हे सर्व पवार साहेबांच्या डोळ्यादेखत सुरू होते, असे म्हणत राज ठाकरे यांनी टोला लगाविला.
रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे राज ठाकरे यांनी जाहीर सभेत पवारांच्या राजीनामा नाट्याचा उल्लेख केला. तसेच बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवित सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले, अजित पवार त्या दिवशी जसं वागत होते, ते पाहून हे सर्व पाहताना पवार साहेबांच्या मनात आले असणार.
अरे आत्ताच तर मी राजीनामा दिलाय आणि हा माणूस (अजित पवार) असा वागतोय. खरंच जर राजीनामा देऊन टाकला तर हा माणूस उद्या मला पण म्हणेल ए गप्प बस. त्या भितीपोटी, या भितीपाई त्यांनी राजीनामा मागे घेतला. जेणेकरून नंतर कसलीही भानगड नको, असे ते म्हणाले.
दुसरीकडे बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवित म्हणाले, तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुमचे अस्तित्व काय? कोण तुम्ही? तुम्ही या देशाचे नागरिक आहात म्हणजे काय आहात? या जमिनीचा तुकडा तुमच्या नावावर आहे, त्यावर तुम्ही उभ्या आहेत. जमीन म्हणजे काय? भुगोल. मोगलांचे राज्य आले, ब्रिटिशांचे राज्य आले, युद्ध झाले.
यांनी तिथे आक्रमण केले, या सगळ्यांचा इतिहास म्हणून पाहिल्यास तो इतिहास भुगोलाशिवाय नाही. प्रत्येकाने जमीन पादक्रांत केली, जमीन ताब्यत घेतली. या देशाची, प्रदेशाची जमीन ताब्यात घेत आहे. हे जमीन ताब्यात घेतो ना त्याला इतिहास म्हणतात, असेही राज ठाकरे म्हणाले.