रायगड – निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीसह रायगडला अक्षरशः झोडपून काढले आहे. यात काजू, फोफळी, आंबा आणि नारळाच्या बागांना सर्वाधिक फटका बसला आहे. यामुळे या भागातील नुकसानग्रस्तांकडून मदतीची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर येथील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत.
शरद पवार रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माणगाव मधील पडझड झालेल्या इमारतींची पाहणी केली. यासोबतच शरद पवार म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर, भरडखोल, हरिहरेश्वर येथे भेट देणार आहेत.
दरम्यान, हा दौरा आटोपताच शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून कशाप्रकारे मदत करता येईल, यावर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 जून रोजी कोकणच्या नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे मुंबईला परत येताच त्यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती.