मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला फ्रंटलची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला संपूर्ण राज्यातून महिला कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी महिला जिल्हाध्यक्ष व नवी कार्यकारणी उभारण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत अनेक निर्णय घेतले गेले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार यांनीही या बैठकीला आवर्जून उपस्थित राहत महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “राज्यात दोन वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण झाल्या आहे. एका ठिकाणी पूरपरिस्थिती तर एका ठिकाणी कोरडा दुष्काळ आहे. देशातून अनेक ठिकाणाहून मदतीचा हात येत आहे. आज अशी परिस्थिती असतानाही आपण आलात याबद्दल आपले आभार.
लोकसभा निवडणूकीत निकाल वेगळा लागला. या निकालावर अनेकांमध्ये संशय निर्माण झालाय. याआधीही निवडणुका झाल्या मात्र यावर संशय निर्माण झाला नाही. लोकांकडून आता बॅलट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी होत आहे. जगात काहीच देशात बॅलट पेपरशिवाय निवडणूक होत आहे.
यासाठी देशातील सत्ताधाऱ्यांच्या व्यतिरिक्त पक्षांची बैठक घेण्यात आली. यासंदर्भात निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी असे निवेदन दिले. मात्र अनेक मोठी मंडळी यात सामील असतानाही याला आयोगाकडून विरोध करण्यात आला. तरीदेखील आपण निवडणुकीला समोरे जायचे आहे.
पंतप्रधान सांगतात ७० वर्षांत जे घडल नाही ते मी केले. म्हणजे अटलजी, अडवाणी यांसारख्या नेत्यांनाही जे जमले नाही ते यांनी केले असा यांचा दावा आहे.
शरद पवार पुढे म्हणाले, देशात महिलांवर अनेक अत्याचार होत आहेत. देशात विकृत मनस्थिती निर्माण झाली आहे. यावर जरब बसण्याची यंत्रणा ढिसाळ झाली आहे. राज्यकर्ते महिलांना सन्मानाने वागणूक देत नाहीत ते यंत्रणा काय चालवणार? महाराष्ट्राची दुसरी राजधनी नागपूर हे आज गुन्हेगारीचे केंद्र बनले आहे. आपले मुख्यमंत्री हे तिथलेच. यासाऱ्या विरोधी आवाज उठवण्याचे काम आपण करणे गरजेचे आहे.
आज देशात सबंध आर्थिक क्षेत्रात अडचण निर्माण झाली आहे. अनेकांच्या रोजगारावर परिणाम होत आहे. अनेक मोठ्या कंपन्या आपले उत्पादन थांबवत आहे. यातून संकटात भर पडणार आहे. सामान्यांची खरेदीशक्ती कमी होत चालली आहे. याविरोधी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. कारखानदारी सोबत शेती हा विषय देखील गंभीर आहे. आत्महत्येचा आकडा यात वाढला आहे. अशा आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट देताना मन अस्वस्थ होते. सरकारच्या तुटपुंज्या मदतीने त्यांचे ओझे कमी होत नाही. सावकारी कायदा राबवला जात असल्याने यात अनेक शेतकरी बळी पडत आहे व आत्महत्येचा आकडा वढतो आहे.
देश चहूबाजूंनी संकटात आहे. आपला पक्ष हा विकासासोबत अन्यायावर मात करणारा पक्ष आहे. यासाठी संघटन मजबूत करण गरजेचे आहे. यातून पक्षाला फायदा आहेच त्यासोबतच राज्याला देखील मोठा फायदा आहे. राज्याच्या पूरपरिस्थितीवर अनेक मदतीचा हात मिळत आहे. मात्र यात मोठा आकडा आपल्या पक्षाचा आहे याचा आनंद आहे. संकटाच्या काळात जो उभा राहतो त्याला लोक विसरत नाही. यासाठी आपण पक्षाच्या संघटनेकडे लक्ष घालणे गरजेचे आहे.
आज अनेक लोक पक्ष सोडत आहे. मात्र जे लोक खटल्यात आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहे त्यामुळे पक्षगळती होत आहेत. आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही. कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी.
निवडणुकीच्या तोंडावर अनेक मोठे निर्णय घेण्यात येतील. यात काश्मीरचा निर्णय घेतला. काश्मीरमध्ये परप्रांतियांनी जमीन घेण्यावर बंदी होती ती उठवण्यात आली. मात्र अशा प्रकारची ११ राज्ये देशात आहेत ज्यात परप्रांतियांना जमीन घेता येत नाही. त्यांचे निर्णय कधी घेणार? आमचे म्हणणे एकच आहे की देशात सर्व राज्याला समान कायदा असायला हवा.
येणाऱ्या निवडणुकीला सामोरे कसे जावे याकडे आपण प्रयत्न करत आहोत. यात अनेक धोरणात्मक निर्णय घेतले जातील. माझा आग्रह हा आहे की आपण अडचणीतून जात आहोत. त्यासाठी तरुणांना व महिलांना पुढाकार देण्याचे काम होईल. नवीन चेहरे समोर आणण्यासाठी पक्षाच्यावतीने करण्याचा विचार केला जाईल.
येत्या २० तारखेला मुख्यमंत्र्यांना निवदेन देण्यात येईल यात शासनाने मदत केली तर ठीक नाहीतर रस्त्यावर उतरण्याचे काम होईल.